मुंबई (Mumbai) : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाहून (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) मेट्रोने थेट नवी मुंबईतील विमानतळावर (Navi Mumbai Airport) पोहोचता येणार आहे.
ही दोन्ही विमानतळे मेट्रो (Metro) रेल्वेने जोडण्यात येणार आहेत. साधारण ३२ किलोमीटरचा हा मेट्रो मार्ग बांधला जाणार असल्याचे सिडकोचे (CIDCO) व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बहुतांश सर्व कामे पूर्ण झाली असून, हे विमानतळ नव्या वर्षांत मार्च महिन्यांत सुरू होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास मुंबई, ठाणे, कल्याण डोंबिवली या शहरातील मेट्रो रेल्वे थेट कनेक्ट केल्या जाणार आहेत. तसेच मुंबईतील समुद्र आणि खाड्यांचा वापर करून जल वाहतूकीने सुद्धा नवी मुंबई विमानतळ जोडले जाणार आहे.
मुंबई विमानतळावर एक रनवे आहे, मात्र नवी मुंबई विमानतळावर दोन रन वे असल्याने त्याची क्षमता दुप्पट आहे. विमानतळावर चार टर्मिनल असून चारही टर्मिनल एकमेकांशी जोडली जाणार आहेत. जेणेकरून कोणत्याही टर्मिनलमधून आत आलेला प्रवाशी इच्छित ठिकाणी पोचणार आहे.
नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर नुकतेच पहिल्या व्यावसायिक विमानाचे लँडींग झाले. या विमानतळावर 29 डिसेंबर रोजी पहिले व्यावसायिक विमान इंडिगो A-320 चे यशस्वी लँडिंग करण्यात आले. मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भार कमी करण्यासाठी नवी मुंबईत उभारण्यात आलेले हे विमानतळ येत्या वर्षात मार्च 2025 मध्ये सुरू होणार आहे.
महिनाभरापूर्वी वायुदलाच्या सी 295 आणि सुखोई 30 या विमानांचे येथे लँडींग झाले होते, या विमानांचे लँडींग यशस्वी झाल्यानंतर पहिल्यांदाच व्यावसायिक विमानाचे लँडिंग करण्यात आले आहे.
हैद्राबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर नवीन मुंबईतील विमानतळ हे देशातील दुसरे सर्वात मोठे विमानतळ आहे. सुमारे 5,945 एकर जागेवर हे विमानतळ उभारण्यात आले आहे. मुंबईपासून 40 किमी अंतरावर पनवेलजवळ हे विमानतळ बांधण्यात आले आहे.
विमानतळाचा रनवे 3.7 किमी इतका असून या विमानतळावर एकाचवेळी 350 विमाने उभी राहू शकतात. येथे देशातील सर्वात मोठी कार्गो प्रणाली तयार करण्यात आली आहे. सिडको आणि जीव्हीके (GVK) यांनी एकत्रितपणे हे विमानतळ बांधले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील बहुतांश सर्व कामे पूर्ण झाली आहेत. रन वे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामे पूर्ण झाली आहेत. सुरुवातीला या विमानतळावरून वर्षाला नऊ लाख प्रवासी प्रवास करू शकतील, तर 100 टक्के काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे 60 लाख प्रवासी वर्षाला प्रवास करतील.