Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
विदर्भ

Nitin Gadkari : 'त्या' कार्यकर्त्यांच्या श्रमामुळेच आम्हाला चांगले दिवस! असे का म्हणाले गडकरी?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : 'शेतकरी समृद्ध झाला पाहिजे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी सरकार विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे. महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे. गावात सिंचनाच्या सुविधा निर्मिती, गावांना जोडणारे रस्ते उत्तम व्हावे आणि गावांचा विकास झाला पाहिजे, ही भावना आहे. चांगल्या रस्त्यांमुळे उद्योग येतात आणि रोजगाराचे दालन खुले होते. गावांच्या विकासाचा मार्गही प्रशस्त होतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केले.

मौदा वाय-जंक्शन येथे सहापदरी उड्डाणपुलाचे व कन्हान नदीवरील उड्डाणपुलाच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार कृपाल तुमाने,आमदार आशिष जयस्वाल, आमदार टेकचंद सावरकर, आमदार राजू पारवे, माजी आमदार अशोक मानकर, बालकदास महाराज, जि.पी. सदस्य राधा अग्रवाल, माजी जि.प. अध्यक्ष निशा सावरकर, जि.प.सदस्य अरुण हटवार, श्रीमती वाडीभस्मे यांची उपस्थिती होती.

गडकरी महणाले की, 'आपल्या भागातील सिंचन प्रकल्पांचा पूर्ण वापर झाला पाहिजे, शेतकऱ्यांना पाणी मिळाले पाहिजे. सिंचन वाढले तर शेतकरी समृद्ध होतील, रस्ते बांधत असताना प्रत्येकवेळी जलसंवर्धनाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यावर आम्ही भर दिला. तलावांचे खोलीकरण केले, नदी नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण केले.

उड्डाणपुलाला देणार स्व. महादेवराव वाडीभस्मे यांचे नाव

'महादेवराव वाडीभस्मे यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या श्रमामुळे आज आम्हाला चांगले दिवस बघायला मिळत आहेत. वाडीभस्मे यांनी अनेकदा माझ्याकडे या पुलाची मागणी केली. पण त्यांच्या हयातीत हा पूल होऊ शकला नाही, याची खंत आहे. त्यांचे जाणे हा माझ्यासाठी धक्का होता. आजचा कार्यक्रम महादेवरावांना खरी श्रद्धांजली आहे,' अशा भावना व्यक्त करून गडकरी यांनी पुलाला स्व. महादेवराव वाडीभस्मे यांचे नाव देणार असल्याची घोषणा केली.