Chandrapur
Chandrapur Tendernama
विदर्भ

Chandrapur : चंद्रपूर जिल्ह्यातील जलसंकट यंदा आणखी बिकट होणार; 'हे' आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : उन्हाचा पारा 42 डिग्रीच्या पुढे गेला. पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न आता गंभीर होऊ लागला. लघुपाटबंधारे विभागाच्या 25 एप्रिलच्या नोंदीनुसार आसोलामेंढा धरणात 14.8890 दलघमी (28.43) टक्के जलसाठा शिल्लक आहे, तर 37 लघुतलाव, 51 माजी मामा तलावांची स्थिती चिंताजनक असल्याने मे महिन्यात जलसंकट आणखी बिकट होण्याचे संकेत आहे.

मामा तलावांत 25.51 टक्के जलसाठा : 

चंद्रपूर पाटबंधारे विभागांतर्गत 59 मामा तलाव आहेत. यातील अंतरगाव, गिरगाव, सायमारा, जनकापूर, एकारा, कोसंबी, सावरगाव, भूज, गोलाभूज, चिरोली व भटाळा येथील तलाव आटण्याच्या टप्प्यात आले आहेत. 51 मामा तलावांतील एकूण जलसाठा 25.41 टक्क्यांवर आला.

30 जूनपर्यंत संभाव्य टंचाईग्रस्त गावे :

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने 1 एप्रिल ते 30 जूनपर्यंत संभाव्य टंचाईग्रस्त गावांची यादी जाहीर केली, त्यामध्ये चंद्रपूर 17, बल्लारपूर 6, गोंडपिपरी 31, पोंभुर्णा 10, चिमूर 9, मूल 17, सिंदेवाही 9, नागभीड 20, ब्रह्मपुरी 4, राजुरा 19, कोरपना 31, जिवती तालुक्यातील 62 गावांचा समावेश आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी काही उपाययोजनाही सुरू आहेत.

इरईने दिला चंद्रपूरकरांना दिलासा :

चंद्रपूरला इरई धरणातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. या धरणाचा संकल्पित साठा 152.400 दलघमी आहे. गुरुवार 25 एप्रिल च्या नोंदीनुसार, इरई धरणात 76.345 दलघमी जलसाठा (50,10 टक्के) उपलब्ध आहे. गत आठवड्यात याच दिवशी 79.696 दलघमी जलसाठा उपलब्ध होता. उपलब्ध पाण्याची गळती न होता काटेकोरपणे वापर झाल्यास चंद्रपूरला टंचाईची तीव्रता जाणवणार नाही, असा दावा प्रशासनाने केला आहे.

चाऱ्याचा प्रश्न गंभीर : 

करोली, कुसर्ला, अड्याळमेंढा, मोनद्वारी, भटाळा हे लघुतलाव कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत. करोली (21.23 टक्के), कुसर्ला (11.20 टक्के) व भटाळ्यात (12.60 टक्के) जलसाठा शिल्लक आहे. शेगाव खुर्द, शेगाव कोरडे झाले.

ग्रामीण भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आराखड्यानुसार बऱ्याच उपाययोजना सुरू आहेत. नळ दुरुस्ती, विहिरीतील गाळ उपसा, कूपनलिका, विंधन विहीर व अन्य कामांना मंजुरी मिळाली, गावांना पाणीटंचाईची झळ बसू नये, यादृष्टीने उपाययोजनांवर जि. प. यंत्रणा काम करीत आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता, ग्रामीण कोलाम पाणीपुरवठा, जि. प. चंद्रपूरचे हर्ष बोहरे यांनी दिली.