Trimbakeshwar Municipal Council
Trimbakeshwar Municipal Council Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Trimbakeshwar Municipal Council: निर्मळ वारीचा कोटीचा खर्च सोसवेना

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : जिल्हाधिकारी कार्यालयाकडून गेल्या पाच वर्षांपासून संत निवत्तीनाथ यात्रेत भाविकांना स्वच्छतागृह पुरवणे, पाण्याची सुविधा पुरवणे यासाठी निर्मळ वारी हा उपक्रम राबवण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर नगरपरिषदेला सूचना दिल्या जात आहेत.

या निर्मळवारीमुळे संत निवृत्तीनाथ यात्रेनंतर त्र्यंबकेश्‍वर परिसरात होणारी दुर्गंधी पूर्णपणे थांबली असून यात्रा खऱ्या अर्थाने निर्मळवारी झाल्याची भावना व्यक्त होत आहे. मात्र, त्र्यंबकेश्‍वर नगरपरिषदेस सरकारकडून मिळणारे सर्व सव्वा कोटींचे अनुदान या एकट्या यात्रेत सुविधा पुरवण्यावरच खर्च होत आहे. यामुळे त्र्यंबकेश्‍वर येथे वर्षभर वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना सोईसुविधा देण्यासाठी निधीच शिल्लक राहत नसल्याचे दिसत आहे. पौषवारीसाठीच ज इतका जवळपास सर्व निधी खर्च केल्यानंतर नंतर येणाऱ्या भाविकांच्या सुविधांसाठी निधी कसा उभा करावा, असा पेच प्रशासनासमोर आहे.

ज्योतिर्लिंगाचे ठिकाण असल्याने अगदी ब्रिटिश काळात १९ व्या शतकात त्र्यंबकेश्‍वर नगरपरिषदेची स्थापना केली आहे. तेव्हापासून या अगदी लहान गावाच्या नगरपरिषदेला यात्राकर आकरण्याची मुभा देण्यात आली होती. महाराष्ट्र सरकारने १९७८ पासून यात्राकर बंद करून त्याऐवजी अनुदान दिले जात आहे. त्र्यंबकेश्‍वर नगरपरिषदेला सध्या वर्षाला सव्वाकोटी रुपये यात्रेकरूंच्या सोईसुविधांसाठ अनुदान मिळत असते.

त्र्यंबकेश्‍वर येथे वर्षभर महाशिवरात्र, उटीची वारी, श्रावण महिन्यात ब्रह्मगिरी प्रदक्षिणा, त्रिपुरारी पौर्णिमा व पौषवारी यासाठी भाविक मोठ्यासंख्येने त्र्यंबकेश्‍वर व संत निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शनासाठी येत असतात. या शिवाय दिवाळी, उन्हाळा व डिसेंबरच्या सुट्यांमध्येही भाविकांची मोठी वर्दळ असते. या सर्व उत्सवांच्या निमित्ताने येणाऱ्या भाविकांना खर्च करण्यासाठी त्र्यंबकेश्‍वर नगर परिषद हे हे यात्रा अनुदान खर्च करते. दरम्यान त्र्यंबकेश्वर येथे दरवर्षी पौष वद्य एकादशीस संत निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी राज्यभरातील जवळपास तीन से साडेतीन लाख भाविक येतात.

यात्रा कालवाधीत पायी दिंड्यांनी येणारे वारकरी भाविक दीड ते दोन लाखांच्या आसपास असतात. दिंड्यांमधून येणारे वारकरी किमान तीन दिवस त्र्यंबकेश्‍वर येथे मुक्काम करतात. यावेळी या भाविकांसाठी निर्मळ वारी या उपक्रमांतर्गत नगर परिषदेकडून फिरचे शौचालय पुरवणे, पाण्याचे टँकर पुरवणे, दिवाबत्ती करणे, स्वच्छता करणे आदींसाठी खर्च करावा लागतो. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या निर्मळ वारीसाठी दरवर्षी सूचना दिल्या जातात, मात्र, या निर्मळवारीत भाविकांना सुविधा पुरवण्यातच एक कोटी रुपयांपेक्षा निधी खर्च होतो. संत निवृत्तीनाथ यात्रोत्सवात गेल्या पाच वर्षांपासून हा निर्मळवारी उपक्रम राबवला जात असून त्यासाठीच नगर परिषदेचे सर्व यात्राअनुदान खर्च होत आहे. यामुळे वर्षभराच्या इतर उत्सवांसाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा देण्यासाठी निधी कसा उपलब्ध करायचा असा पेच आहे. यामुळे सरकारने निर्मळवारीसाठी स्वतंत्र निधी द्यावा म्हणजे यात्रा अनुदानातील निधी इतर उत्सवांसाठी वापरता येईल, असे नगर परिषदेचे म्हणणे आहे.

यात्रोत्सवासाठी नगर परिषदेचा खर्च
-
निर्मळवारी : ८५ लाख रुपये
- पाणी टँकर : २ लाख रुपये
- साफ सफाई : २ लाख रुपये
- जंतुनाशक फवारणी : १ लाख रुपये
- यात्रेनंतर स्वच्छता : २ लाख रुपये
- जमीन सपाट करणे : २ लाख रुपये

सीसीटीव्ही : २ लाख रुपये
बँरेकेडिंग : २ लाख रुपये
उद्घोषणा : १ लाख रुपये
दिवाबत्ती : २ लाख रुपये
 एकूण : १ कोटी रुपये

यात्रोत्सवातून उत्पन्न
- यात्रा पटांगण : २ लाख ५० हजार रुपये
- व्यवसायिक जागा भाडे : १० लाख ६० हजार रुपये
- एकूण १३ लाख १० हजार रुपये