नाशिक (Nashik): सिंहस्थ कुंभमेळा 2027 अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला असताना त्र्यंबकेश्वर परिसरातील सुमारे 1000 कोटी रुपयांच्या कामांना अद्याप सुरुवात न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्य सचिव Rajesh Agrawal यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना खडसावले.
सिंहस्थ कुंभमेळा २०२७च्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर परिसरात जवळपास हजार कोटी रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मात्र, त्यातील एकाही कामाला अद्याप सुरवात झालेली नाही. याबाबत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली आहे.
सिंहस्थ वर्षभरावर येऊन ठेपला असून, अद्याप एकाही कामाला सुरवात झालेली नाही. तुम्हाला झोप कशी येते, अशी उद्विग्नता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे बघून व्यक्त केल्याचे समजते. त्र्यंबकेश्वरच्या कामांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून ती लवकरात लवकर सुरू करावित व सर्व विकास कामे निर्धारित वेळेत, उच्च दर्जासह पूर्ण करा, अशा सूचना अग्रवाल यांनी दिल्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे २०२७ मध्ये होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जवळपास २३ हजार कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. त्यातील काही कामांना सुरुवात झाली आहे.
या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी तीन दिवस नाशिक दौ-यावर आलेले मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दोन दिवस नाशिक परिसरातील कामांची पाहणी केल्यानंतर तिस-या दिवशी त्यांनी त्र्यंबकेश्वर व इगतपुरी तालुक्यातील कामांचा आढावा घेतला.
त्र्यंबकेश्वरमध्ये बाह्यवळण रस्ता, डी. पी. रस्ते, दर्शन पथ, घोटी त्र्यंबकेश्वर महामार्ग, गौतमी गोदावरी धरणातून अहल्या धरणात पाणी टाकून गोदावरी बारमाही प्रवाही करणे, जव्हार फाट्यापासून पुढे गोदावरीवर घाट बांधणे, शासकीय कार्यालयांसाठी मध्यवर्ती इमारत बांधणे, चक्रतीर्थ, कावनई व सर्वतीर्थ टाकेद येथील पायाभूत सुविधा व तीर्थक्षेत्र विकास आदी कामे मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, यातील एकाही कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली नसल्याचे मुख्य सचिवांना आढळून आले.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या वर्षभरावर येऊन ठेपला असून, शेकडो कोटींच्या कामांना अद्याप प्रारंभही झालेला नाही, हे बघून मुख्य सचिन अचंबित झाले. ही एवढी मोठी कामे वर्षभरात कशी पूर्ण होणार, या चिंतेने उद्विग्न झालेल्या मुख्य सचिवांनी तेथे उपस्थित असलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना, तुम्हाला झोप कशी येते, असा प्रश्न विचारला.
राज्य सरकारने सिंहस्थासाठी येणा-या भाविकांसाठी या पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला असून ही कामे कुठल्याही परिस्थितीत सिंहस्थापूर्वी पूर्ण झाली पाहिजे, असेही त्यांनी बजावले. ही कामे ज्या विभागाच्या कक्षेत येतात, तेथील विभाग प्रमुखांनी सिंहस्थातील कामांना सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजेश औटी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. पवन दत्ता, अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, नवनाथ सोनवणे,
मनोज ढोकचौळे,अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणदिवे, तहसीलदार गणेश जाधव, त्रंबक नगर परिषदेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव, उपविभागीय अभियंता अभिजित शेलार, उमाकांत कुमावत, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक अमोल गोटे, सहाय्यक वनरक्षक (वन्यजीव संरक्षण) प्रशांत खैरनार, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता योगेश्वर पाटील आदींसह विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्य सचिव अग्रवाल यांनी सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या भाविकांना सुरक्षित, स्वच्छ व सुसज्ज सुविधा उपलब्ध करून देणे ही प्रशासनाची सर्वोच्च जबाबदारी आहे. नाशिक–त्र्यंबकेश्वर सहा पदरी रस्त्याच्या कामांना गती देण्यासोबतच गुणवत्तेवर भर देण्यात यावा. कुशावर्त कुंडातील पाण्याची नियमित स्वच्छता, कुंडातील कचरा व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी करावी.
कुशावर्त कुंड परिसरातील विकास कामे करताना धार्मिक व ऐतिहासिक वारशाचे महत्त्व लक्षात घेत भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे. पर्वणी काळात भाविकांच्या मोठ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर कुशावर्त परिसरातील स्वच्छता व्यवस्थापनासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्याचेही निर्देश त्यांनी दिले.
मुख्य सचिवांनी काय दिले आदेश?
त्र्यंबकेश्वरात ₹1000 कोटींच्या कामांना अद्याप सुरुवात नाही
मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
सिंहस्थ 2027 अवघ्या वर्षभरावर
महत्त्वाचे रस्ते, घाट, तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प प्रलंबित
कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला निर्देश