Simhastha Maha Kumbh Mela, nashik Tendernama
उत्तर महाराष्ट्र

Nashik: सिंहस्थातील विकासकामांमध्ये पंजाब सरकारचीही उडी; काय घेतला निर्णय?

गंगा घाटावरील कपूरथळा स्मारकाची पुनर्विकास करणार

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : येथे २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्या साठी महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडून अनेक कामे सुरू असताना पंजाब सरकारनेही येथील गंगा घाटावरील कपूरथळा स्मारकाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून तेथे लंगर सेवा सुरू केली जाणार आहे.

पंजाब सरकारचे मंत्री व काही अधिकारी यांनी नुकतीच नाशिक येथे भेट देऊन जागेची पाहणी केली. यासंदर्भात पंजाब सरकारला अहवाल सादर करणार असून त्यानंतर सरकारची मान्यता मिळेल, अशी माहिती आम आदमी पार्टीचे नाशिक येथील कार्यकर्ते स्वप्निल घिया यांनी दिली आहे.

पंजाब सरकारच्या मालकीचे गोदाघाट परिसरातील बालाजी कोट व दिल्ली दरवाजा परिसरात ऐतिहासिक कपूरथळा स्मारक आहे. या स्मारकास पंजाबचे कॅबिनेटमंत्री मोहिंदर भगत यांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली.  यावेळी त्यांनी या स्मारकाच्या विकासाचा प्रस्ताव लवकरच पंजाब मंत्रिमंडळासमोर मांडण्यात येणार असल्याचे सांगितले.

कपूरथळा स्मारकाची दुरवस्था झाली असून तेथे आधुनिक सुविधांनी सुसज्ज स्मारक उभारण्याची मागणी आम आदमी पार्टीचे स्थानिक कार्यकर्ते स्वप्निल घिया यांनी मागील आठवड्यात आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक व दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊन केली होती. या ठिकाणी भाविकांसाठी सुसज्ज विश्रामगृह, यात्रेकरूंसाठी लंगर हॉल (अन्नछत्र व्यवस्था) व सिंहस्थानिमित्त देश-विदेशातील पत्रकारांसाठी आंतरराष्ट्रीय माध्यम माहिती केंद्र उभारण्याची मागणी केली होती. त्यानुसार पंजाब सरकारने तातडीने पावले उचलत कॅबिनेट मंत्री मोहिंदर भगत यांना नाशिक येथे पाहणी दौऱ्यासाठी पाठवले.

मोहिंदर भगत यांनी १२ फेब्रुवारी रोजी  वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांसह स्मारकाची पाहणी केली. यावेळी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री नविंदरसिंग अहलुवालिया उपस्थित होते. त्यांनीही या स्मारकाच्या पुनर्बांधणीसाठी सातत्याने पाठपुरावा केला असल्याचे नमूद केले.

पंजाब सरकार व स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयातून ही जागा भाविकांसाठी अधिक उपयुक्त स्वरूपात विकसित करण्याचा मानस असल्याचे मोहिंदर भगत यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच विकास आराखडा तयार करून पुनर्बांधणीस गती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

नाशिकमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या दृष्टीने ही जागा अत्यंत महत्त्वाची असल्याने येथे अन्नदान व्यवस्था व सुसज्ज विश्रांतीगृह उभारण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मांडला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पंजाब सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह शीख समाजाचे स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.

काय आहे कपूरथळा स्मारक

नाशिकमधील कपूरथळा स्मारक ही वास्तविकपणे कपूरथळा राज्याच्या महाराजा रंधीर सिंह यांच्या स्मृतीत बांधलेली एक स्मारक (समाधी) आहे. हे ठिकाण गंगावरीच्या घाटावर आहे. महाराजा रंधीर सिंह (१८३१-१८७०) हे कपूरथळा राज्याचे राजा होते. त्यांनी १८५२ ते १८७० पर्यंत राज्य केले. ते अहलुवालिया वंशातील सिख शासक होते. १८५७ च्या स्वातंत्र्य संग्रामात त्यांनी ब्रिटिशांना मदत केली. त्यांचा मृत्यू २ एप्रिल १८७० रोजी युरोपला जात असताना एडनच्या खाडीजवळ समुद्रात मृत्यू झाला.

तेथून त्यांचा मृतदेह मुंबईला आणण्यात आला आणि त्यांचा पुत्र प्रिन्स खरक सिंह याने नाशिकला नेला व गोदावरी नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ स्मारक बांधण्यात आले. ती एक घुमटाकार रचना आहे. याच परिसरात पंजाबच्या शेवटच्या राणी जिंद कौर यांच्यावरही अंतीमसंस्कार करण्यात आले होते.