नाशिक (Nashik): महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या अंदाजपत्रकात दिव्यांग बांधवांच्या कल्याणासाठी असलेल्या निधीत कपात करण्यात आली, तर मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी राखीव केलेल्या निधीवर डल्ला मारून प्रभाग क्र. २५ मधील रस्त्यांसाठी ८ कोटी रुपयांचा निधी रस्त्यांसाठी तरतूद करण्यात आल्याचा आरोप शिवसेना महानगरप्रमुख व नगरसेवक प्रवीण (बंटी) तिदमे यांनी महासभेत केला.
प्रशासनाने गरिबांच्या आणि दिव्यांगांच्या हक्काच्या पैशावर डल्ला मारून विशिष्ट प्रभागांचे लाड पुरवले आहेत," असे म्हणत त्यांनी सभागृहात आकडेवारीचा पाढाच वाचला. स्थायी समितीने प्रस्तावित केलेला १३३ कोटींचा निधीतील ६० टक्के (अंदाजे ८० कोटी रुपये) निधी केवळ ६ प्रभागांमध्ये वाटून घेतल्याचा पुरावाच त्यांनी सभागृहात मांडला. विशेष म्हणजे महापालिकेच्या सत्तेत शिवसेना सहभागी असून त्यांच्याच महानगर प्रमुखाने सत्ताधा-यांचे कान टोचले आहेत.
नाशिक महापालिकेच्या २०२६-२७ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यासाठी बोलावलेल्या महासभेत शिवसेनेचे महानगरप्रमुख नगरसेवक तिदमे यांनी अंदाजपत्रकातील त्रुटी पुराव्यानिशी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिल्या. मागासवर्गीय वस्त्यांच्या विकासासाठी स्थायी समितीने राखीव ठेवलेल्या निधीतील ८ कोटी रुपये प्रभाग २५ मधील रस्त्यांच्या कामांसाठी वळवण्यात आले आहेत.
मागासवर्गीय बांधवांसाठी कल्याणकारी योजना, कौशल्य विकास आणि शिष्यवृत्तीसाठी मागच्या वर्षी ५ कोटी ५७ लाख रुपये खर्च करण्यात आले आणि यावर्षी या निधीत कपात करुन केवळ २ कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे, हेही त्यांनी लक्षात आणून दिले. मागासवर्ग व दिव्यांग यांचा निधी केवळ राजकीय सोयीसाठी वापरणे हा सामाजिक अन्यायच आहे, अशी टीका तिदमे यांनी केली.
नाशिक महापालिकेने दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठी मागच्या वर्षी ३१ कोटी रुपये खर्च केल्याचे अंदाजपत्रकात नमूद आहे. यावर्षी मात्र त्यात कपात करून २५ कोटी ६६ लाखांचीच तरतूद आहे. दिव्यांग कल्याणकारी योजनांसाठीचा निधी कपात करुन आपल्या मर्जीतल्या प्रभागांत रस्ते बांधण्यासाठी वळविण्यात आल्याचा आरोपही तिदमे यांनी केला.
भेदभावपूर्ण निधी वाटप
स्थायी समितीने १३३ कोटी ६६ लाखांच्या विशेष निधीपैकी ६० टक्के (अंदाजे ८० कोटी) निधी केवळ ६ (सहाच) प्रभागांनाच दिला आहे. त्यातही त्या प्रभागांमधील ठराविक नगरसेवकांनाच तो निधी दिला असल्याचा आरोप प्रवीण तिदमे त्यांनी केला आहे.
त्यातील प्रभाग क्रमांक ३ साठी २६ कोटी ६६ लाख रुपये, प्रभाग क्रमांक २५ साठी २० कोटी ७५ लाख रुपये व प्रभाग क्रमांक ३० साठी १० कोटी ४० लाख रुपये निधी दिल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याशिवाय प्रभाग १४, १५, २६ आणि २८ यांना शून्य (०) रुपये निधी देऊन वाऱ्यावर सोडल्याचीही टीका त्यांनी केली.
काय आहेत मागण्या...
मागासवर्गीय वस्त्यांचा वळवलेला ८ कोटींचा निधी त्वरित मागासवर्गीय वस्त्यांचा विकासासाठी वर्ग करावा दिव्यांग बांधवांच्या निधीतील कपात रद्द करावी. प्रभाग २४ चा पाणी आणि ड्रेनेज प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत या भागातील घरपट्टी आणि पाणीपट्टी वसूल करू नये. १३३ कोटी ६६ लाखांच्या विशेष तरतुदीचे सर्व १२२ सदस्यांच्या प्रभागात समसमान वाटप करावे, या प्रमुख मागण्या प्रवीण तिदमे यांनी केल्या आहेत.
तसेच अंदाजपत्रकातील वरील चुका दुरुस्त न झाल्यास वंचित घटकांना सोबत घेऊन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.