नाशिक (Nashik): पश्चिम आशियातील युद्धामुळे डांबराचा तुटवडा निर्माण झाल्याने गेल्या महिनाभरापासून रखडलेली रस्ते दुरुस्तीची कामे आता पुन्हा सुरू झाली आहेत. डांबराचा पुरवठा हळूहळू सुरळीत होत असल्याने नाशिक महापालिकेने महत्वाच्या मार्गांवरील खड्डे बुजवण्याला प्राधान्य दिले आहे. डांबराच्या तुटवड्यामुळे नाशिकरो़ड उड्डाणपुलासह इतर अनेक रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे रखडली होती. त्या कामांना आता वेग यैऊ शकणार आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून नाशिक महापालिका सुमारे १५० किलोमीटर लांबीचे २८ रस्ते विकसित करत आहे. त्यापैकी जवळपास ६० किलोमीटर लांबीच्या प्रमुख मार्गांवर व्हाईट-टॉपिंग केले जात आहे. उर्वरित रस्त्यांचे डांबरीकरण व कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे.
त्याचप्रमाणे या रस्त्यांची कामे होण्यापूर्वी जलवाहिनी, गॅसपाईपलाईन, ऑप्टिकल फायबर आदी सात प्रकारची कामे करण्यासाठी रस्ते खोदले जात आहे. ही कामे झाल्यानंतर त्या रस्त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्यातील ज्या रस्त्यांवर व्हाईट टॉपिंग किंवा कॉंक्रिटीकरण केले जाणार आहे, तेथे काही अडचण नाही. मात्र, ज्या ठिकाणी या खोदलेल्या रस्त्यांवर पुन्हा डांबरीकरण करायचे आहे, तेथे डांबराच्या तुटवड्यामुळे समस्या निर्माण झाली होती.
आता पश्चिम आशियातील युद्ध थांबल्याने डांबर उपलब्ध होऊ लागले आहे. यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तारवाला नगर ते अमृतधाम चौकादरम्यानच्या आंतररिंगरोडवरील खराब झालेल्या भागांची डागडुजी केली. हा मार्ग आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महत्त्वाचा आहे. याशिवाय पंचवटी आणि नाशिक रोड विभागातील अपघातप्रवण व खड्डेमय रस्त्यांवरही दुरुस्तीची कामे सुरू करण्यात आली आहेत.
महापालिका अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कच्च्या मालाचा पुरवठा सुधारू लागल्याने डांबर निर्मिती पुन्हा सुरू झाली आहे. त्यामुळे उपलब्धतेनुसार सर्वाधिक खराब झालेल्या रस्त्यांवर प्राधान्याने डांबरीकरण केले जात आहे. गुंजाळबाबा नगर परिसरातील अत्यंत खराब झालेल्या रस्त्याचेही डांबरीकरण करण्यात आले आहे. महापालिका शहरातील सर्वाधिक अड्डे असलेल्या व वाहतुकासाठी धोकादायक बनलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीवर भर देत असून, डांबराचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत झाल्यानंतर उर्वरित भागांतील दुरुस्ती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे.
कुंभमेळ्याशी संबंधित सात प्रकारच्या विविध सुविधांसाठी रस्त्यांखाली वाहिन्या (डक्ट) टाकण्याचे काम बहुतांश मार्गांवर पूर्ण झाले असून, खोदलेल्या चरांचे समतलीकरण सुरू आहे. काही ठिकाणची उर्वरित कामेही लवकरच पूर्ण केली जाणार असल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
नाशिकरोड येथील स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपुलावरील डांबरीकरणाचे काम संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या रस्त्याचे काम कुंभमेळा प्राधिकरणकडून मंजूर झालेले आहे. मात्र, गेल्या महिनाभरात केवळ जुना रस्ता खरडण्याचे काम झाले असून नव्या डांबराचा थर अद्याप टाकण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात वाहनचालकांना उखडलेल्या रस्त्यावरूनच प्रवास करावा लागणार की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांनी पावसाळ्यापूर्वी डांबरीकरण पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र सध्या केवळ रस्ता खरडून ठेवण्यात आल्याने विशेषतः दुचाकीस्वारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.