MIDC Tendernama
उत्तर महाराष्ट्र

महाराष्ट्रातील 36,211 कंपन्यांना 5 वर्षांत टाळे; नाशिकमधील 840 कंपन्याही बंद

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik): गेल्या पाच आर्थिक वर्षांत महाराष्ट्रातील तब्बल  ३६,२११ खासगी कंपन्या लिक्विडेट, विसर्जित किंवा कंपनी रजिस्टरमधून स्ट्राइक ऑफ झाल्या आहेत. खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरातून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यात तब्बल ८४० कंपन्या बंद झाल्या, तर पुण्यात ६४३३, ठाण्यात ४७०४, मुंबई शहरात तब्बल १२००९ आणि नागपुरात १४७८ कंपन्यांना टाळे लागले आहे. संभाजीनगरमध्येही ६५४ कंपन्या बंद झाल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
  

खासदार राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित करून राज्यातील बंद पडलेल्या कंपन्या, कंपन्या बंद झाल्यानंतर किती कामगार बेरोजगार झाले, कितींची भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची देणी आहेत, याची एकत्रित माहिती मागवली होती. याची एकत्रित माहिती केंद्रीय कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. यामुळे महाराष्ट्रात उद्योग बंद होण्याची वास्तविक व्याप्ती किती मोठी आहे आणि त्याचा थेट फटका किती कुटुंबांना बसला आहे, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. 

खासदार राजाभाऊ वाजे यांनी संसदेत कंपन्या बंद होण्याबरोबरच विस्थापित कामगारांच्या पुनर्वसनाचा प्रश्नही थेट उपस्थित केला. कंपन्या बंद झाल्यानंतर कामगारांना कायदेशीर देणी मिळाली का? भविष्य निर्वाह निधी, उपदान आणि थकीत वेतनाची रक्कम किती कामगारांना मिळाली? प्रभावित कामगारांसाठी विशेष पुनर्वसन योजना आहे का? या प्रश्नांची उत्तरे केंद्राकडून मागण्यात आली होती.

मात्र केंद्र सरकारने स्पष्ट केले की, खासगी कंपन्यांचे कामकाज बंद झाल्यामुळे प्रभावित झालेल्या कामगारांची माहिती मंत्रालयाकडे ठेवली जात नाही. कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेत गेल्यास किंवा परिसमापनात गेल्यास कामगारांचे दावे संबंधित कायदेशीर प्रक्रियेत हाताळले जातात, असे सरकारने सांगितले. मात्र महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्यांच्या प्रकरणात प्रत्यक्ष किती कामगार प्रभावित झाले, याचा एकत्रित आकडा सरकारकडे नाही.

जिल्हानिहाय बंद कंपन्या
मुंबई शहर : १२,००९
पुणे : ६,४३३
ठाणे : ४,७०४
नागपूर : १,४७८
नाशिक : ८४०
रायगड : ८२२
संभाजीनगर : ६५४
अहमदनगर : ३०८
जळगाव : २१५
सातारा : १९६

कोणत्या क्षेत्रातील किती कंपन्या बंद

व्यवसाय सेवा क्षेत्र - १४,६१३
उत्पादन, खाणकाम व उत्खनन - ६,५८२
व्यापार - ४,१९६
सामुदायिक, वैयक्तिक व सामाजिक सेवा - ३,३६१
बांधकाम - २,३५६
वाहतूक, साठवणूक व दळणवळण - १,३३६
स्थावर मालमत्ता व भाडेपट्टा - १,१४९
कृषी व संलग्न उपक्रम - १,१७८
वित्त - १,०१२
वीज, वायू व पाणी - ३८७
विमा - ४१

गेल्या पाच वर्षांत ३६ हजारांहून अधिक खासगी कंपन्या बंद झाल्याची अधिकृत आकडेवारी संसदेत समोर आली आहे.उद्योग बंद होण्यामागची कारणे काय, त्यातून किती रोजगार गेले आणि प्रभावित कामगारांचे काय झाले, याचा सरकारने गांभीर्याने विचार केला पाहिजे. केवळ नवीन उद्योग आणण्याच्या घोषणा नकोत;  उद्योग टिकले पाहिजेत, रोजगार वाचला पाहिजे आणि उद्योग बंद पडल्यास कामगारांच्या हक्कांचे संरक्षण झाले पाहिजे.

- राजाभाऊ वाजे, खासदार, नाशिक