Nitin Gadkari
Nitin Gadkari Tendernama
पुणे

Pune: नितीन गडकरींनी का केली रेल्वे फाटकमुक्त महाराष्ट्राची घोषणा?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune0 : महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत आतापर्यंत २५ रेल्वे ओव्हरब्रीज (ROB) उभारण्यात आले असून, दरवर्षी ११ अशा प्रकारे पुढील टप्प्यांत ९१ ठिकाणी रेल्वे ओव्हरब्रीज उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे,’’ अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी रविवारी दिली.

महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर कॉर्पोरेशन लिमिटेड (MAHARAIL) तर्फे नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, ठाणे, पालघर, धुळे, जळगाव, बुलडाणा आणि नागपूर जिल्ह्यांत उभारलेल्या नऊ रेल्वे उड्डाण पुलांचे लोकार्पण व अकरा रेल्वे उड्डाण पूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री गडकरी यांच्या हस्ते ऑनलाइन करण्यात आले. या वेळी गडकरी यांनी ही माहिती दिली.

या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील कांबळे, ‘महारेल’चे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रमकुमार उपस्थित होते.

गडकरी म्हणाले, ‘‘राज्यात २ हजार ४५० हून अधिक रेल्वे फाटक आहेत. रेल्वे फाटकांमुळे वाहतूक कोंडी होते. नागरिकांचा वेळ जातो. अपघाताचा धोकाही वाढतो. त्यामुळे राज्याला रेल्वे फाटकमुक्त करण्यासाठी ‘महारेल’तर्फे शंभर उड्डाण पूल, भुयारी मार्ग बांधण्यात येत आहेत. त्यासाठीचा खर्च राज्य सरकार व रेल्वे मंत्रालयाकडून ५०-५० टक्के केला जात असून, केंद्रीय रस्ते निधी अंतर्गतही तरतूद करण्यात आली आहे.

सेतूबंधन योजनेत अकरा उड्डाण पूल मंजूर करण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकाराने महाराष्ट्र रेल्वे फाटकमुक्त होईल. त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. त्याची जबाबदारीही ‘महारेल’कडे देण्यात आली आहे.’’ दरम्यान, पालखी मार्गांचे काम जवळपास पूर्ण होत आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘रेल्वे उड्डाण पूल बांधणे अवघड काम असते. त्यामुळे एका उड्डाण पुलाला दहा-दहा वर्षे लागतात. काहींना चौदा वर्षांचा वनवास भोगावा लागतो. परंतु राज्य व केंद्र सरकार एकत्र आल्यावर काय चमत्कार होऊ शकतो, हे या कार्यक्रमातून दिसून येते. लोकांना फायदा व्हावा, अपघात कमी व्हावेत, यासाठी हे उड्डाण पूल उभारण्याचे काम गतीने होण्यासाठी ‘महारेल’ची स्थापना करण्यात आली आहे. महाविकास आघाडीच्या काळात महारेलला निधी देणे बंद करण्यात आले होते. आमचे सरकार आल्यावर पुन्हा निधी उपलब्ध करून देण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र फाटकमुक्त करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.’’

मुख्यमंत्र्यांकडून गडकरींचे कौतुक
राज्यात यापूर्वी असलेल्या युती सरकारच्या काळात नितीन गडकरी यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम हे खाते होते. त्यावेळी त्यांनी मुंबईत ५५ उड्डाण पूल आणि मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधला. तेव्हा त्यांच्यावर टीका झाली. आज त्याचा फायदा पुणे आणि मुंबईकरांना होतो आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे गडकरी यांना ‘रोडकरी’ म्हणत, त्यानंतर त्यांनी उड्डाण पूल बांधल्यानंतर ते ‘पुलकरी’ झाले. आता फाटकमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे आता ते ‘फाटकमुक्तकरी’ म्हणून ओळखले जातील,’’ असे शिंदे म्हणाले.