मुंबई (Mumbai) : महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’वृक्षारोपण कार्यक्रम झाला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपल्या सर्व देव-देवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आहेत.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आहे. ती येत्या काळात पूर्ण करू. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ. श्रीक्षेत्र ज्योतिबा डोंगरावर अनेक भाविक येतात, त्यांची चांगली सोय व्हावी तसेच येथील वातावरणही उल्हसित रहावे या दृष्टीनेच विकास आराखड्याची चांगली अंमलबजावणी करण्यावर भर दिला जाईल. पन्हाळगडावरील झालेल्या चांगल्या कामाप्रमाणेच याही विकास आराखड्यातून चांगली कामे होतील. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमास शुभेच्छा देऊन समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी इथिक्स, इकॉनॉमिक्स, इकॉलॉजी आणि एन्व्हायर्मेंट या तीन गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या २०७० पर्यंत भारत कार्बन न्यूट्रल देश करण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपले पर्यावरणपूरक कार्य महत्त्वाचे असल्याचे सांगितले. ‘दख्खन केदारण्य’ सारख्या प्रकल्पांची उभारणी महत्वाची असल्याचे सांगत त्यांनी विविध उदाहरणांमधून पर्यावरण विषयक महत्त्व पटवून दिले. या विकास आराखड्याच्या अंमलबजावणी दरम्यान ऑक्सिजन बर्ड पार्क उभारण्यात यावा अशा सूचनाही त्यांनी प्रशासनास केल्या.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी अनेक वर्षांपासूनचे जोतिबा विकास आराखड्याचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे सांगत या ठिकाणी विभागाच्या जमिनीवर शास्त्रीय पद्धतीने, अभ्यास करून वृक्षारोपण करण्याचे नियोजन करण्याचा मानस व्यक्त केला. ते म्हणाले, चार हजार वर्षांपूर्वीचे वनवैभव पुन्हा या ठिकाणी उभे करू. हे करीत असताना तसेच मंदिर विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना ग्रामस्थांशिवाय कुठल्याही प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार नाही. स्थापन करण्यात येत असलेल्या प्राधिकरणात ग्रामस्थांचा सहभाग असेल व त्यांचे मत विचारात घेतले जाईल असेही कोरे यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दख्खन केदारण्य प्रकल्पास शुभेच्छा देऊन या पद्धतीने जिल्ह्यात इतरही ठिकाणी अशाच प्रकारचे उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. खासदार धैर्यशील माने यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी विकास आराखडा शास्त्रीय दृष्टिकोनातून, पर्यावरण तज्ज्ञांचे मार्गदर्शनाखाली राबविण्यात येईल असे सांगितले. आर्किटेक्ट संतोष रामाने यांनी आराखडा निर्मिती प्रक्रिया व त्याचे महत्त्व उपस्थितांना सविस्तर सांगितले. यावेळी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार अशोकराव माने यांच्यासह पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयेन, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग श्री.कदम, प्रांताधिकारी समीर शिंगटे व वाडी रत्नागिरी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.