new mumbai pune expressway Tendernama
मुंबई

नव्या एक्सप्रेस-वेमुळे मुंबई - पुणे प्रवास करा फक्त 90 मिनिटांत

New Mumbai Pune Expressway: अटल सेतू ते पुणे रिंगरोडला जोडणारा नव्या द्रुतगती मार्ग 3 वर्षांत उभारण्याचा प्लॅन; तब्बल 15 हजार कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वरील वाहतूक कोंडी आणि तासनतास चालणाऱ्या प्रवासाला लवकरच पूर्णविराम मिळणार आहे. (New Mumbai Pune Expressway)

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) यासंदर्भातील एका महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी पुढील पाऊल टाकले असून, नवा आठ पदरी द्रुतगती मार्ग या दोन्ही शहरांना जोडणार आहे. हा मार्ग पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाची नवी जीवनवाहिनी ठरणार आहे.

सध्या पुणे ते मुंबई प्रवासासाठी अडीच ते तीन तास लागतात. लोणावळा-खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी किंवा दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे हा वेळ कधीकधी पाच-सहा तासांपर्यंत जातो. मात्र, प्रस्तावित नवा मार्ग थेट मुंबईच्या अटल सेतूपासून सुरू होऊन पुण्याच्या वर्तुळाकार रस्त्याला (रिंगरोड) जोडला जाणार आहे. यामुळे प्रवासाचा वेळ चक्क ९० मिनिटांवर येईल.

म्हणजेच, जेवढ्या वेळात आपण शहरातल्या शहरात प्रवास करतो, तेवढ्या वेळात एक शहर सोडून दुसऱ्या शहरात पोहोचणे शक्य होईल.

हा नवा मार्ग अभियांत्रिकीचा एक उत्तम नमुना असेल. नवी मुंबई विमानतळ आणि जेएनपीटी बंदराला स्पर्श करत हा रस्ता पुढे सह्याद्रीच्या डोंगररांगांमधून जाईल. निसर्गाचे अडथळे पार करण्यासाठी यात अत्याधुनिक बोगदे आणि उंच पुलांचा वापर केला जाणार आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील शिवरे येथे हा मार्ग संपेल. याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, सातारा किंवा कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांना आता पुण्याच्या मुख्य शहरात शिरण्याची गरज उरणार नाही. ते थेट रिंगरोडवरून आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतील.

पुणे शहरात होणारी जड वाहनांची गर्दी हे प्रदूषणाचे आणि वाहतूक कोंडीचे मुख्य कारण आहे. या नवीन मार्गामुळे मुंबईहून येणारी अवजड वाहने शहराबाहेरूनच सातारा-बेंगळुरूच्या दिशेने वळवली जातील. यामुळे पुणे शहरातील अंतर्गत रस्त्यांवरील ताण कमालीचा कमी होईल. सुमारे १५ हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा या मार्गावरुन दिवसाला तब्बल ३ लाख वाहने हाताळण्याची क्षमता असणार आहे.

या प्रकल्पाच्या सविस्तर अहवालाला मंजुरी मिळाली असून, पुढील सहा महिन्यांत त्याचे आराखडे पूर्ण होतील. प्रत्यक्ष कामाला सुरवात झाल्यानंतर केवळ तीन वर्षांत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पुणे-मुंबई दरम्यान आणखी एक द्रुतगती मार्ग होणार आहे. पुणे-बंगळूर 'ग्रीनफिल्ड कॉरिडॉर'चा हा भाग असणार आहे. या मार्गाच्या 'डीपीआर'ला मंजुरी मिळाली असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. काम सुरू झाल्यानंतर तीन वर्षात मार्ग तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे