Thane to Borivali
Thane to Borivali Tendernama
मुंबई

दुहेरी बोगद्याचे टेंडर L&T, 'मेघा'ला; खर्चात 3 हजार कोटींची वाढ

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे आणि बोरीवली प्रवास दीड तासावरून अवघ्या १५ मिनिटांत करण्यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून भुयारी मार्ग तयार करण्यासाठी खोदाव्या लागणाऱ्या दुहेरी बोगद्यांचे कंत्राट अखेर बलाढ्य लार्सन अँड टुब्रो कंपनी (L&T) व मेघा इंजिनिअरिंग अॅड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) या कंपन्यांना मिळाले आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडून (MMRDA) यासाठी मागवण्यात आलेल्या टेंडरमध्ये (Tender) एल अँड टी व एमईआयएल कंपन्यांची टेंडर सर्वात कमी रकमेचे ठरले आहे. दरम्यान, सुरुवातीला सुमारे ११,२३५ हजार कोटींचे बजेट असलेल्या या प्रकल्पाची किंमत ३ हजार कोटींनी वाढून आता १४ हजार कोटींवर गेली आहे.

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे बोरिवली आणि ठाणे दरम्यान प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. ठाणे ते बोरिवली या अंतरासाठी घोडबंदरमार्गे २३ किमी अंतर असून हे अंतर गर्दीच्या वेळी पार करण्यासाठी सकाळी आणि संध्याकाळी एक तासाहून अधिक काळ लागतो. हे लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने २०१५ मध्ये ठाणे-बोरिवली भूमिगत रस्त्याची योजना आखली होती. परंतु २०२० मध्ये हा प्रकल्प मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आल्याने 'एमएमआरडीए'कडून या प्रकल्पावर काम सुरू झाले.

यामध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यासह रस्ते बांधणी करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रकल्पासाठी उपरोक्त कंपन्यांनी स्वारस्य दाखवले होते. तांत्रिक बाबींची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, बोगद्याच्या आत २३.६८ किमी रस्ते आणि आणखी २ किमी संपर्क रस्ते बांधण्यासाठी आर्थिक टेंडर उघडण्यात आले. 'एमएमआरडीए'ने नुकतीच या टेंडरची छाननी पूर्ण केली.

'एमईआयएल' कंपनीचे टेंडर सर्वात कमी दराचे ठरले असून, या कंपनीला पॅकेज एकचे काम देण्यात आले आहे. तसेच दुसऱ्या क्रमांकाचे टेंडर एल अँड टी चे ठरले असून, या कंपनीला पॅकेज २ चे काम देण्यात आले आहे. पहिल्या पॅकेजमध्ये बोरीवली टोकाकडून ठाण्याच्या दिशेने ५.७५ किमी बोगदा खणण्याच्या कामाचा समावेश आहे, तर दुसऱ्या पॅकेजमध्ये ठाण्याकडून बोरीवलीच्या दिशेन ६.०.९ किमी बोगदा खणण्याच्या कामाचा समावेश आहे. हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ४ वर्षे लागणार असून, २०२७ साली या रस्त्यावरून वाहने धावू शकतील.

एका वेळी चार ठिकाणी बोगदा खणण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. बोगद्याची एकूण लांबी २३.६८ किमी असून, २ किमी जोड मार्ग असतील. जोड मार्गाची लांबी वगळता प्रत्येक बोगद्याची लांबी ११.८४ किमी असेल. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणारा हा रस्ता बोरीवलीतील मागाठणे एकता नगर येथून सुरू होईल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या जमिनीखालून (२३ मीटर खोल) ठाण्यात टिकुजिनी वाडीत बाहेर पडेल.

सध्या बोरीवली-ठाणे या २४ किमी प्रवासासाठी एक तासापेक्षा अधिक वेळ लागतो. हा रस्ता पूर्ण झाल्यावर मात्र हा प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ५७.०२ हेक्टर वनक्षेत्राची गरज भासणार आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ १०६.५ चौरस किमी म्हणजेच १०६५० हेक्टर आहे. रस्त्यासाठी यापैकी केवळ ०.५ टक्के क्षेत्राची गरज लागणार आहे.