मुंबई (Mumbai): हा देश मुठभर लोकांचा किंवा उद्योगपतींचा नाही तर सर्वसामान्यांचा आहे पण भूमिपुत्रांचा गळा आवळण्यासाठी भांडवलदार आसुसलेले आहेत. दोन गुजराती विकत आहेत तर दोन खरेदी करत आहेत, असे चित्र देशात आहे. आता तिसऱ्या मुंबईच्या नावाखाली भांडवलदार रायगडच्या उंबरठ्यावर आले आहेत, असे टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
जिल्हा परिषदेची ही निवडणूक भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, आपली परंपरा कायम राखण्यासाठी एकसंध रहा आणि काँग्रेस मविआच्या उमेदवारांना विजयी करा, असे आवाहन सपकाळ यांनी केले आहे. त्यांनी आज रायगड जिल्ह्यातील जासई, चिरनेर, सातिर्जे, चोंढी येथे प्रचार रॅलीत सहभाग घेतला.
यावेळी ते म्हणाले की, जिल्हा परिषद निवडणुकीतील कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता विजय आपलाच आहे हे आत्ताच दिसून येत आहे. रायगड जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेस मविआला चांगले यश मिळेल व सत्तेच्या चाव्या काँग्रेसच्या हातात असतील.
लोकनेते दि. बा. पाटील यांनी भूमिपुत्रांसाठी मोठा लढा दिला, आता पुन्हा भूमिपुत्रांसमोर भांडवलदारांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. या भांडवलशाहीला थांबवण्यासाठी काँग्रेस मविआला विजयी करा असे सपकाळ म्हणाले.
एका प्रश्नाला उत्तर देताना सपकाळ म्हणाले की, नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा पाटील यांचे नाव द्यावे ही मागणी काँग्रेस पक्षाने पहिल्यापासूनच केली आहे. पण देवेंद्र फडणवीस मात्र दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळास देण्यास टाळाटाळ करत आहेत. आताच विमानतळाचे एनएम नाव दिसत आहे पण एनएमच्या आडून नरेंद्र मोदी हे नाव देण्याचा घाट घातला तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.