Mumbai Metro Tendernama
मुंबई

मिरा-भाईंदरच्या विकासाची ‘मेट्रो’ भरारी! तब्बल 14 वर्षांनंतर डिसेंबरमध्ये स्वप्नपूर्ती

दहिसर ते काशीमिरा पट्ट्यात मेट्रो धावणार; अंधेरी, एअरपोर्ट ते थेट कुलाब्यापर्यंतचे अंतर होणार कमी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मिरा-भाईंदरकरांसाठी मुंबईचा प्रवास म्हणजे अनेकदा वाहतूक कोंडी आणि गर्दीशी संघर्ष असतो. मात्र, येत्या काही दिवसांत हे चित्र पालटणार आहे.

गेल्या १४ वर्षांपासून उराशी बाळगलेले ‘मेट्रो’चे स्वप्न आता सत्यात उतरत असून, या डिसेंबर अखेर दहिसर ते काशीमिरा या पट्ट्यात मेट्रो धावताना दिसणार आहे. तसेच भविष्यात मिरा-भाईंदरला थेट दक्षिण मुंबईशी जोडणारा हा एक महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.

मिरा-भाईंदर शहराच्या दळणवळणाच्या इतिहासात या वर्षीचा डिसेंबर महिना सुवर्णअक्षरांनी लिहिला जाणार आहे. वाहतूक कोंडीतून मुक्तता आणि वेगवान प्रवासाची हमी देणाऱ्या ‘महामेट्रो’च्या सेवेसाठी आता काउंटडाऊन सुरू झाले आहे.

राज्याचे परिवहन मंत्री आणि स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांनी नुकतीच या मार्गाची पाहणी केली असून, दहिसर ते काशीमिरा हा टप्पा डिसेंबर अखेर प्रवाशांसाठी खुला करण्याचे नियोजन असल्याचे स्पष्ट केले आहे.

हा मार्ग सुरू होताच नागरिक मेट्रोने थेट अंधेरीपर्यंत पोहोचू शकतील. तेथून पुढे मेट्रो-१ आणि एअरपोर्ट स्टेशनवरून मेट्रो-३ च्या माध्यमातून थेट कुलाब्यापर्यंतचा प्रवास सुसाट होणार आहे. मंत्रालय, विधान भवन किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांसारख्या दक्षिण मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी आता तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडण्याची गरज उरणार नाही. नवीन वर्षात ही कनेक्टिव्हिटी या शहराच्या विकासाला नवी गती देईल.

२००९ मध्ये जेव्हा प्रताप सरनाईक लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले, तेव्हा त्यांनी शहराला मेट्रोचे स्वप्न दाखवले होते. आज १४ वर्षांच्या अखंड पाठपुराव्यानंतर आणि विविध तांत्रिक व प्रशासकीय अडथळ्यांची शर्यत पार केल्यानंतर हे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. २०१४ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यामुळे या प्रकल्पाने गती घेतली आणि आता त्याचे दृश्य परिणाम दिसू लागले आहेत.

केवळ दहिसर-काशीमिरापुरतेच हे नियोजन मर्यादित नाही. डिसेंबर २०२६ पर्यंत ही मेट्रो लाईन नेताजी सुभाषचंद्र बोस मैदानापर्यंत विस्तारित करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्याही पुढे जाऊन वसई-विरार मेट्रो लाईनचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात वसई-विरार ते थेट कुलाबा असे अखंड मेट्रो जाळे तयार होणार असून, एमएमआर रीजनच्या प्रवासाची व्याख्याच बदलणार आहे.

सध्या या मार्गावरील तांत्रिक कामे अंतिम टप्प्यात आहेत. मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते या सेवेचे लोकार्पण होऊन मिरा-भाईंदरकरांचा प्रवास ‘हायस्पीड’ होणार आहे.