मुंबई (Mumbai): मुंबईची 'लाईफलाईन' समजल्या जाणाऱ्या वाहतूक व्यवस्थेत एका क्रांतिकारी पर्वाची सुरुवात होत आहे. स्वप्ननगरी मुंबई आणि वेगाने विकसित होणारी नवी मुंबई या दोन शहरांमधील अंतर आता केवळ नावालाच उरणार आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा विळखा सोडवण्यासाठी आणि प्रवाशांचा अमूल्य वेळ वाचवण्यासाठी प्रस्तावित असलेल्या महत्त्वाकांक्षी 'मेट्रो ८' मार्गाच्या कामाला आता खऱ्या अर्थाने गती मिळणार आहे. या प्रकल्पातील सर्वात महत्त्वाची घडामोड म्हणजे राज्य सरकारने या २३,००० कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पाच्या आराखड्याला अधिकृत मंजुरी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील संपर्क व्यवस्थेला नवी दिशा मिळणार असून दोन शहरांमधील प्रवास अतिशय सुखकर होणार आहे.
मुंबई आणि उपनगरात दररोज लाखो नागरिक प्रवास करतात. केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देश-विदेशातून शिक्षण, रोजगार, पर्यटन, कला आणि व्यापारासाठी मुंबईत येणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. वाढत्या लोकसंख्येचा ताण रस्ते वाहतुकीवर येत असून वाहतूक कोंडी ही एक नित्याची डोकेदुखी ठरली आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी मेट्रोचे जाळे विस्तारले जात आहे. याच शृंखलेतील 'मेट्रो ८' हा मार्ग मुंबईसाठी 'गेमचेंजर' ठरणार आहे. मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि नवी मुंबईतील आगामी आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना थेट जोडणारा हा देशातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग असेल.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे वेळेची प्रचंड बचत. सध्याच्या रस्ते मार्गाने एका विमानतळावरून दुसऱ्या विमानतळावर जाण्यासाठी वाहतूक कोंडीमुळे साधारणपणे १२० मिनिटे म्हणजेच दोन तासांचा कालावधी लागतो. मात्र, मेट्रो ८ मुळे हेच अंतर आता अवघ्या ३० मिनिटांत कापले जाणार आहे. राज्य सरकारने विमानतळ ते विमानतळ अशा या थेट संपर्क व्यवस्थेला मान्यता दिल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
नवी मुंबई विमानतळ लवकरच प्रवाशांच्या सेवेत रुजू होणार आहे, परंतु तिथे पोहोचण्यासाठी सध्या सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. या मेट्रो प्रकल्पामुळे ही उणीव भरून निघणार असून आंतरराष्ट्रीय प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
अंदाजे २३ हजार कोटी रुपये खर्चून उभारल्या जाणाऱ्या या मेट्रो मार्गावर साधारणपणे २० स्थानके असतील अशी अपेक्षा आहे. हा मार्ग केवळ दोन विमानतळांनाच जोडणार नाही, तर मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही शहरांमधील आर्थिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करेल.
मुंबईत रोजगारासाठी येणाऱ्या चाकरमान्यांना आता लोकल ट्रेन व्यतिरिक्त एक वेगवान आणि वातानुकूलित पर्याय उपलब्ध होणार आहे. नवी मुंबईच्या विकासाचा हा पुढचा टप्पा मानला जात असून, यामुळे तिथल्या स्थावर मालमत्ता क्षेत्राला आणि व्यापारालाही मोठी चालना मिळेल.
वाढत्या नागरीकरणाचा विचार करून राज्य सरकारने उचललेले हे पाऊल भविष्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा पाया भक्कम करणारे आहे. दोन आंतरराष्ट्रीय विमानतळे मेट्रोने जोडली गेल्यामुळे केवळ देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय वाहतुकीतही सुलभता येईल. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर आता या कामाला वेग येणार असून, येत्या काही वर्षांत मुंबईकरांचे वेगवान प्रवासाचे स्वप्न प्रत्यक्षात अवतरणार आहे.