Mumbai Metro tendernama
मुंबई

मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; ₹17,725 कोटींच्या Metro-13ला हिरवा कंदील

25.03 किमी मार्गावर 16 स्थानके; पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्गाची कामे हाती घेण्याचे निर्देश

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेशातील Mira-Bhayandar, Vasai, Nalasopara, Naigaon आणि Virar या भागांना जोडणाऱ्या Metro-13 प्रकल्पाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सुमारे ₹17,724.99 कोटी खर्चाच्या या 25.03 किलोमीटर मार्गावर 16 स्थानके प्रस्तावित आहेत. प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत Metro-13च्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांतून जाणाऱ्या या मार्गाची अंमलबजावणी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (MMRDA) करण्यात येणार आहे.

21.78 किमी उन्नत, 3.25 किमी भूमिगत मार्ग

Metro-13ची एकूण लांबी 25.03 किलोमीटर असून त्यापैकी 21.78 किलोमीटर मार्ग उन्नत, तर 3.25 किलोमीटर मार्ग भूमिगत असेल. एकूण 16 स्थानकांपैकी 13 उन्नत आणि तीन भूमिगत स्थानके प्रस्तावित आहेत.

या मार्गामुळे Mira Road, Vasai, Nalasopara, Naigaon आणि Virar परिसर एकमेकांशी जोडले जाणार आहेत. Nalasopara, Naigaon आणि Virar येथील उपनगरी रेल्वे स्थानकांशी Metro-13ची जोडणी करण्याचे नियोजन आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम येथे Metro-9शीही जोडणी प्रस्तावित आहे. सर्व स्थानकांवर बससेवा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Vasai खाडीवर रस्ता-मेट्रोचा पूल

या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे Vasai खाडीवरील Panju बेटाला जोडणारा 4.92 किलोमीटर लांबीचा सहा पदरी रस्ता-मेट्रो पूल. या पुलावर रस्ता आणि मेट्रो अशी संयुक्त सुविधा प्रस्तावित आहे. Chikhal Dongari येथे Metro Depot उभारण्याचेही नियोजन आहे.

प्रकल्पासाठी एकूण 24.84 हेक्टर भूसंपादन अपेक्षित आहे. मंजुरीनंतर पाच वर्षांत Metro-13चे काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

2031 मध्ये दररोज 4.49 लाख प्रवाशांचा अंदाज

Metro-13मुळे रस्ते प्रवासाच्या तुलनेत प्रवासाचा वेळ 50 टक्क्यांनी कमी होण्याचा अंदाज आहे. खासगी वाहनांचा वापर तसेच प्रमुख राष्ट्रीय महामार्गावरील वाहनांची घनता कमी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर कार्बन उत्सर्जनातही घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

2031 मध्ये या मार्गावर दररोज सुमारे 4.49 लाख प्रवासी प्रवास करतील, असा अंदाज आहे. औद्योगिक आणि लॉजिस्टिक केंद्रांसह Vasai-Virar, Mira-Bhayandar आणि मुंबई उपनगरांमधील दळणवळण अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा मार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.

सहा महिन्यांत प्राथमिक कामांना सुरुवात

Metro-13च्या अंमलबजावणीसाठी पुढील सहा महिन्यांत भूसंपादन आणि पोहोच मार्ग तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या प्राथमिक अंमलबजावणीला आता गती देण्याचे आव्हान MMRDAसमोर राहणार आहे.