Sion Road Bridge Tendernama
मुंबई

Mumbai : गोखले पूल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला; विक्रमी वेळेत काम पूर्ण

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : गोखले पुलाच्या बहुप्रतिक्षित दुसऱ्या भागाचे उद्घाटन रविवारी संध्याकाळी सांस्कृतिक मंत्री आणि मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते आणि अंधेरी (पश्चिम) येथील भाजप आमदार अमीत साटम (Amit Satam) यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी मंत्री आशिष शेलार यांनी सांगितले की हा पूल म्हणजे भविष्यात मुंबईच्या गतीने होणाऱ्या विकासाची एक झलक आहे. याप्रसंगी आमदार अमीत साटम यांनी अलीकडच्या काळात मुंबई महापालिकेने सर्वात जलद गतीने पूर्ण केलेल्या प्रकल्पांपैकी एक म्हणून गोखले ब्रिजचे वर्णन केले. गोखले पूल बंद झाल्यानंतर १५ महिन्यांच्या आत एक बाजू कार्यान्वित करण्यात आली आणि २८ महिन्यांच्या आत संपूर्ण पूल कार्यान्वित करण्यात आला. हा एक असाधारण अभियांत्रिकी विक्रम आहे. कारण एका सक्रिय रेल्वे मार्गावर बांधकामाचा समावेश होता. हा बीएमसचा सर्वात जलद पूर्ण झालेल्या प्रकल्पांपैकी एक आहे, असे आमदार साटम म्हणाले.

गोखले पुलासारखे विक्रमी काम भविष्यात मुंबईत मोठ्या प्रमाणावर होण्याकरता मुंबईकरांना आशीर्वादाची साद आमदार साटम यांनी यावेळी घातली. याउलट, ऑगस्ट २०१८ मध्ये काम सुरू झाले असले तरी, पाच वर्षांच्या विलंबानंतर नोव्हेंबर २०२३ मध्ये डिलाईल पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. आमदार साटम यांनी पुढे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसीच्या अकार्यक्षम आणि अस्पष्टतेमुळे पुलाचे काम लांबणीवर पडल्याची टीका केली. जुलै २०१८ मध्ये गोखले पुलाचा एक भाग कोसळला होता, ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर बीएमसीने कोसळलेल्या भागाच्या पुनर्बांधणीचा विचार सुरू केला. तथापि, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बीएमसी प्रशासनाने २० महिन्यांचा विलंबानंतर मार्च २०२० मध्ये कामाचे आदेश जारी केले. तरीही, प्रत्यक्ष काम नोव्हेंबर २०२१ मध्येच सुरू होऊ शकले. त्यातही रेल्वे ट्रॅकवरील भाग रेल्वे किंवा बीएमसी कोण बांधणार याची स्पष्टता नव्हती, असे आमदार साटम यांनी सांगितले. 

आमदार साटम यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये त्यांनी प्रगतीचा आढावा घेण्यासाठी प्रकल्पस्थळाला भेट दिली. त्या भेटीदरम्यान बीएमसीने नियुक्त केलेल्या सल्लागाराने स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल सादर केला. त्यात पूल अत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे दिसून आले. स्टीलला मोठ्या प्रमाणात गंज लागला होता आणि कधीही पडू शकत होता, असे समोर आल्याचे आमदार साटम यांनी सांगितले. त्यानंतर आमदार अमित साटम यांनी तत्कालीन महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्याकडे हा मुद्दा उपस्थित केला. चहल त्यांनी नोव्हेंबर २०२२ मध्ये गोखले पूल बंद करण्याचे आदेश दिले. त्यानंतर तत्कालीन मुंबई उपनगरमंत्री मंगल प्रभात लोढा, बीएमसी आणि रेल्वे यांच्यासोबत एक संयुक्त बैठक बोलावण्यात आली आणि त्यात एक व्यापक पुनर्बांधणी रणनीती आखण्यात आली. तेव्हापासून, प्रकल्पाला लक्षणीय गती मिळाली, असे आमदार साटम म्हणाले. आमदार साटम पुढे म्हणाले की, जुना पूल पाडण्याचे काम जानेवारी २०२३ मध्ये सुरू झाले आणि मार्च २०२३ मध्ये नवीन पुलाचे बांधकाम सुरू झाले. प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आम्ही नियमित प्रकल्पस्थळी भेटी दिल्या आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहभागाचा या प्रकल्पाला फायदा झाला. त्यांनी या पुलाला दोनदा भेट दिली. या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम २६ फेब्रुवारी २०२४ रोजी पुलाचा एक भाग उघडण्यात झाला, त्यानंतर फक्त १५ महिन्यांनी दुसऱ्या भागाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आज गोखले पुल पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला करण्यात आला, असे आमदार साटम पुढे म्हणाले.