Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : 60 कोटी खर्चूनही कोणी घातला लिंकरोड खड्ड्यात?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर शहरात जडवाहनांमुळे वाहतुकीचा कोंडी होऊ नये त्यासाठी नागपूर-मुंबई हायवेला जोडणारा लिंकरोड बारा वर्षांपूर्वी बनविण्यात आला. हा लिंकरोड छत्रपती संभाजीनगर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी (अहमदनगर) महामार्गाला छेदून जात असल्याने, तसेच वाळुज - पंढरपूर औद्योगिक क्षेत्रात जात असल्याने या महामार्गावर जड वाहनांसह कामगारांना ने - आण करणारी वाहने, दुचाकीस्वारांची मोठी वर्दळ असते. मात्र रस्ताच खड्यात गेल्याने वाहनधारकांना पाठदुखीचा त्रास सहन करावा लागत आहे.

दुसरीकडे वाहनांची स्पेअरपार्ट ढिले होऊन खुळखुळा होत आहे. टेंडरनामाने या रस्त्याचा लेखाजोगा काढला असता आत्तापर्यंत ६० कोटी रुपये या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खर्च करण्यात आले आहेत. मात्र इतका निधी खर्च करूनही रस्ता मृत्युचा महामार्ग झाला आहे.

छत्रपती संभाजीनगरातील अपघाताचा रस्ता म्हणून ख्याती मिळवलेला जालना रस्त्याची वाहतूक कोंडी कमी व्हावी म्हणून पैठणरोड ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर (अहमदनगर) हा लिंकरोड ३५ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आला. या रस्त्याच्या बांधकामाची जबाबदारी राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होती. मात्र आता पैसे गिळणारा रस्ता म्हणून हा लिंकरोड नावरुपास येत आहे.

मागील बारा वर्षांपासून या रस्त्याच्या कामावर ६० कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केल्याचे दाखवण्यात आले. प्रत्यक्षात वेगवेगळ्या विभागांकडून होत असलेला खर्च कागदोपत्रीच दाखवला जात आहे. एवढा खर्च होऊनही सातारा पोलिस चौकीपासून सुरू होणाऱ्या या रस्त्यावर ए. एस. क्लब पर्यंत खड्डेच खड्डे आहेत. वर्षभरापूर्वी फक्त पाच किलोमीटर रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी साडेसात कोटी रुपये खर्च करण्यात आले. ते पावसासोबतच वाहून गेल्याचे उघड झाले आहे.

लिंकरोड  सर्वाधिक वर्दळीचा रस्ता बनला आहे. बीड, पुणे, मुंबई नागपूरमार्गे येणारी सर्व अवजड वाहने याच मार्गावरून जातात. शिवाय वाळुज - पंढरपूर औद्योगिक वसाहतीमुळे राज्य शासनाने या मार्गावर मोठा खर्च करून रस्ता चांगला करण्याचे काम हाती घेतले. मात्र, पाच किलोमीटरच्या रस्त्याच्या देखभालीसाडी सार्वजनिक बांधकाम विभागावर सोपविण्यात आली असल्याने प्रत्येक जण स्वत:ची तिजोरी भरण्यात मग्न आहे.

या एकाच रस्त्यावर खड्डे दुरूस्तीच्या नावाखाली मागील १२ वर्षांत ६० कोटी रूपये खर्च केल्याचे  दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात सर्वच विभागांनी कागदोपत्री पूर्तता करून कामचलाऊपणा केल्याचे नेहमीच्या पावसाळ्यात दाखवून दिले आहे.

पैठणरोड पोलिस चौकीपासून ते ए. एस. क्लबपर्यंत लिंकरोड रस्त्याचे रुंदीकरण मार्च २०११ - १२ मध्ये करण्यात आले. सुरवातीलाच सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम डावलून लिंकरोडचे टेंडर काढण्यात आले होते. शहरातील एका कंत्राटदाराने याप्रकरणी  न्यायालयाचे दार ठोठावले होते. रस्ते विकास महामंडळाने लिंकरोडच्या कामाची टेंडर २२ फेब्रुवारी २०११ मध्ये काढले होते.

काही कंत्राटदारांनी टेंडर  प्रक्रियेत नव्याने टाकलेल्या जाचक अटींवर आक्षेप घेतला होता. एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी हे काम वरिष्ठांच्या आदेशानुसार मुंबईच्या एका बड्या कंत्राटदाराच्या घशात घालण्याचा डाव आखला होता. टेंडरमधील जाचक अटींबद्दल छत्रपती संभाजीनगर शहरातील कंत्राटदारांनी आक्षेप घेत न्यायालयात दाद मागितली होती.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपसचिवांनी काढलेल्या अध्यादेशाप्रमाणे काही अटी घालण्यात आलेल्या होत्या. ते नियम डावलून एमएसआरडीसीच्या अधिका-यांनी एका बड्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी हा उद्योग केल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यावर अध्यादेशामधील सूचना, बदल पाहता न्यायालयाने या रस्त्याची टेंडर प्रक्रिया एक महिन्यासाठी स्थगित करण्याचे आदेश दिले होते.‌ आता या रस्त्याची अवस्था पाहून कामातही भ्रष्टाचार झाल्याचे खड्डे ओरडून सांगत आहेत.