Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : रेल्वेमार्ग ओलांडण्यातच जातोय निम्मा दिवस

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) : शिवाजीनगर, चिकलठाणा रेल्वेगेट भूयारीमार्गाचे रखडलेले काम आणि रेल्वे स्टेशन निर्लेप उद्योगसमूह ते बीड बायपास, सिडको जयभवानी चौक ते बीड बायपास अखंड उड्डाणपुलाचे काम रखडलेले आहे. संग्रामनगर चौकातील सदोष उड्डाणपुलामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. त्यात अखंड धावणार्‍या रेल्वेगाड्यांमुळे चिकलठाणा, बाळापूर, सातारा - देवळाईसह फुलेनगरवासीयांना बीड बायपासच्या दिशेने जाताना मार्गांवरील लोहमार्ग ओलांडावाच लागतो.

दरम्यान रेल्वे गेटवर दोन लाख वाहनचालकांना २४ तासांपैकी किमान १२ तास अकारण ताटकळत उभे राहावे लागत आहे. शहरात सुविधांची बोंबाबोंब असताना छत्रपती संभाजीनगरवासीयांसाठी आता कोणीच वाली उरला नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

संभाजीनगर येथील रेल्वे स्थानकावरून दररोज ४० ते ४५  गाड्यांची ये-जा सुरू असते. येथील महत्त्वाकांक्षी मॉडेल स्टेशनचा दुसरा टप्पा आणि पीटलाइनच्या बाता सुरू आहेत. प्रत्यक्षात काम पूर्ण झाले नाही. असे असले तरी या सर्व टप्प्याचे काम झाल्यावर आणि पूर्वीपेक्षा आता गाड्यांची संख्या बरीच वाढली आहे. शहराच्या हद्दीत दहा रेल्वे गेट असून, त्यातील पाच गेटमधून स्थानिक वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.

पंधरा मिनिटांत गेट बंद!

गाडीला सिग्नल मिळताच सर्व रेल्वे गेट बंद होतात. गाडी स्थानकावरून धिम्या गतीने निघाल्यानंतर गेटपासून पुढे जाईपर्यंत किमान १५ मिनिटांचा वेळ लागतो. फुलेनगर एमआयडीसी गेटपर्यंत येण्यास गाडीला १०  ते १५ मिनिटे लागतात, तर शिवाजीनगर गेटपर्यंत येण्यास पंधरा मिनिटे लागतात. चिकलठाणा रेल्वेस्थानकाकडून संभाजीनगरच्या दिशेने येणार्‍या गाडीलाही पंधरा मिनिटांचा कालावधी लागतो. चिकलठाण्याहून रेल्वे निघाल्यानंतर संभाजीनगरच्या स्थानकादरम्यान येणारे सर्व गेट बंद होतात.

'या' गाड्यांमुळे अधिक त्रास

सचखंड, देवगिरी, नंदीग्राम, काकीनाडा, अजिंठा, तपोवन, अजमेर नरसापूर-नगरसोल एक्स्प्रेस, हैदराबाद पॅसेंजर, नांदेड पुणे सुपरफास्ट एक्स्प्रेस, धर्माबाद-मनमाड, रामेवश्वरम ओखा, नगरसोल-जालना डेमू एक्स्प्रेस, शताब्दी एक्सप्रेस या गाड्यांच्या वेळेत वाहनधारकांना बराच वेळ गेटवर ताटकळत उभे राहावे लागते.

एका रेल्वेगाडीसाठी 15 मिनिटे ब्रेक

- शहरातून सकाळी ६ ते रात्री १२ वाजेदरम्यान ३० रेल्वेगाड्यांची ये-जा असते,तर रात्री १२ ते सकाळी ६ वाजेदरम्यान १५ रेल्वेगाड्या ये-जा करतात.
- एका रेल्वेसाठी पंधरा मिनिटे रेल्वे गेट बंद असते.
- एकूण ४५ गाड्यांसाठी ६००  मिनिटे गेट बंद असते. म्हणजेच सरासरी दहा तास रेल्वे गेट बंद केले जातात.

वर्दळीचे फाटक आणि गेट क्रमांक

पैठण रोड - रेल्वेस्टेशन उड्डाणपूल - ५२
फुलेनगर एमआयडीसी रेल्वे स्टेशन- ५३ ए
शिवाजीनगर - ५५
मुकुंदवाडी- बाळापूर - ५६
चिकलठाणा यार्ड- ५७