Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : स्मार्ट सिटी बनवत असलेले हेच का 'आयडीयल' रस्ते?

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेनच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याचे टेंडरनामाने आधीच उघड केले होते. आता अवकाळी पावसाने या रस्त्यांवर पाणी साचल्याने अधिकारी आणि ठेकेदारांची खाबुगिरी उघड झाली आहे. या नव्या रस्त्यांवर पाणी साचणे ही बाब म्हणजे महापालिका प्रशासकांचेच अपयश असून, कारभाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर प्रशासकीय प्रमुखांचा दबदबा कमी होत असल्यामुळेच कोट्यावधींच्या कामात असा उघड उघड भ्रष्टाचार घडतो, असा सूर स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत होत असलेल्या रस्त्यांकडे पाहूण नागरिकांमधून व्यक्त होत आहे. या निकृष्ट रस्ते प्रकरणात आयआयटीच्या तांत्रिक सल्लागारांसह छत्रपती संभाजीनगरातील यश एनोव्हेटीव्हचा प्रकल्प सल्लागार समीर जोशी याची देखील चौकशी करून ठेकेदार ए. जी. कन्स्ट्रक्शन कंपनीचा असलम राजस्थानी याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी पुढे आली आहे. आता प्रशासकांच्या कारवाईवर लक्ष आहे.

रस्ते कामात गुणवत्ता नियंत्रण अधिकार्‍यांनी आपल्या जबाबदारीशी प्रामाणिक राहून काम केल्यास रस्त्यांवर खड्डे पडणार नाहीत व पाणी देखील साचणार नाही, असे टेंडरनामा पाहणी दरम्यान नागरिकांनी सांगितले. ‘अवकाळी पावसाने शहरातील रस्त्यांवरील साचले पाणी’ या बातमीवर तक्रारींचा पाऊस पडल्यावर टेंडरनामा प्रतिनिधीने शुक्रवारी व शनिवारी शहरात पाहणी केली. दरम्यान, प्रतिनिधी रस्तेच पाण्याखाली गेल्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैद करत असताना काही नागरिकांनी प्रशासनातील जबाबदारी निश्चित केलेला संबंधित सर्वच छोट्या मोठ्या अभियंत्यांची आणि ठेकेदाराची हातमिळवणी असल्याशिवाय उघड उघड मापात पाप दिसूच शकत नाही, तर, काही नागरिकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यांचा दर्जा ढासळलेला असताना प्रशासक संबंधितांवर कारवाई का करत नाहीत, असा सवाल करत त्यांना देखील दोष दिले. तर काही नागरिकांनी प्रशासन, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींना दोष न देता जिथेकुठे रस्त्यांचे अथवा इतर कोणत्याही प्रकल्पाचे बांधकाम चालु असेल, तिथल्या नागरिकांनी एकत्र येऊन या भ्रष्टाचाराची किड बंद करण्याची गरज असल्याची भावना व्यक्त केली.

काय आहे नेमके प्रकरण

अवकाळी पावसामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर तळी साचल्याचे चित्र काही नवीन नाही. मात्र कोट्यावधी रूपये खर्च करून नव्यानेच होत असलेल्या आयडीयल रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. सिमेंट रस्त्यावर साचलेले पाणी अंगावर उडत असल्याने चकमकी होत आहेत. तर त्यात उखडलेल्या खडीचा  अंदाज न आल्याने किरकोळ अपघात होत आहेत. शहरातील स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत झालेल्या सर्वच ठिकाणी रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले आहे. या पाण्याची दुर्गंधी सुटत असल्याने या रोडवरून जाणारे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. दुर्गंधीपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना नाकाला रुमाल लावून जावे लागत आहे. याच पाण्यात डासांची वाढ होते. त्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पाण्याचे तळे साचले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या पाण्यातून वाहन गेल्यास इतरांच्या कपड्यावर घाण पाणी उडते. एका वाहनामुळे दुसऱ्या वाहनचालकाच्या किंवा पादचाऱ्यांच्या अंगावर पाणी उडाल्यास त्यांच्यात वाद निर्माण होतो. अनेक वेळा प्रकरण हाणामारीपर्यंत जाते. साचलेल्या पाण्यातून  लोक सुसाट वाहन पळवतात.

अधिकाऱ्यांकडून ठेकेदाराची पाठराखन

याबाबत स्मार्ट सिटीतील एका अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले हा प्रकल्प सुरूवातीला ३१७ कोटींचा होता. त्यात १११ रस्ते होते. पण निधी उपलब्ध न झाल्याने शेवटी ८८ कोटीतून केवळ २२ रस्ते होत आहेत. यात ठेकेदाराला मोठ्या प्रमाणात मशिनरी खरेदी करावी लागली. १५ टक्के कमी दराने त्याचे टेंडर स्विकारण्यात आले. यात स्मार्ट सिटी प्रशासनाचा पैसा वाचला. टेंडरमधील अटीशर्तीनुसार त्याला दहा वर्ष रस्त्यांची देखभाल करावयाची आहे. याउलट त्यानेच प्रशासनाला दरवाढ करण्याबाबत नोटीस दिल्याचे सांगत ठेकेदाराची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, टेंडरमध्ये दरवाढीचा मुद्दा नाही, काम सुरू होण्यापूर्वीच तत्कालीन प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्याला मर्यादीत काम असल्याची सूचना केली होती. विशेष म्हणजे माझा मुद्दा हा निकृष्ट कामासंबंधी आहे, असे प्रतिनिधीने म्हटल्यावर मात्र अधिकारी गार झाले. कुठे निकृष्ट काम आहे ते आम्हाला कळवत चला म्हणजे ठेकेदाराला दंडात्मक कारवाई करणे सोपे होईल, असे म्हणत अधिकाऱ्यांनी विषय संपविला.

स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनची अशी ही चालबाजी

छत्रपती संभाजीनगर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून आधी शहरातील १११ रस्त्यांची कामे केली जाणार होती. या कामासाठीचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले होते. परंतु १११ रस्त्यांच्या यादीत यापूर्वीच कामे झालेल्या काही रस्त्यांचा समावेश करण्यात आला होता. या संदर्भात 'टेंडरनामा'ने वृत्त प्रसिद्ध करताच स्मार्ट सिटीच्या व्यवस्थापनाने नंतर रस्त्यांच्या कामासाठी दिलेल्या एनओसींची यादी महापालिकेकडून मागवली होती. त्यात रस्त्यांची कामे यापूर्वी झालेली असल्याचे दिसताच स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांनी ते रस्ते यादीतून वगळले होते.

हेच का तुमचे स्मार्ट अन् आयडीयल रस्ते

तत्कालीन मनपा प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सिईओ आस्तिककुमार पाण्डेय यांनी शहरातील रस्ते स्मार्ट सिटी प्रकल्पातून स्मार्ट व आयडियल करणार, असे म्हटले होते. यासाठी तांत्रिक सल्लागार म्हणून आयआयटीची निवड केली होती. या रस्त्यांची डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टसाठी छत्रपती संभाजीनगरातील समीर जोशी यांच्या यश एनोव्हेशन कंपनीची प्रकल्प सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. यासाठी जनतेच्या कोट्यावधी रूपयाचा चुराडा केला गेला. मात्र, एकीकडे या रस्त्यांचे काम अनेक भागात अर्धवट ठेवल्याने धूळ आणि एक रस्ता दुरुस्त केला तर दुसरा उखडला जात आहे , तर दुसरीकडे काही रस्त्यांचे बांधकामच अद्याप सुरू झालेले  दिसत नाही, अशी दयनीय अवस्था झाली आहे. अनेक रस्त्यांचे काम अर्धवट ठेवल्याने वाहनचालक नागरिकांना दररोज धुळीचा सामना करावा लागत आहे त्यात आता अवकाळी पावसाने चिखलाची भर पडली आहे. तसेच काही रस्त्यांच्या दुसऱ्या बाजूचे काम सुरू असतानाच पहिली बाजू उखडून गेलेली दिसत आहे. काही रस्त्यांना मुहुर्तच न लावल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील दगड-गिट्टीचा रोज सामना करावा लागत आहे.