छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात अनेक ठिकाणी खुलेआम उघड्यावर मांसविक्री सुरू असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात छत्रपती संभाजीनगर वासीयांचा वर्षानूवर्ष तगादा लक्षात घेऊन तत्कालीन महापालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शहागंज परिसरात तब्बल पंधरा हजार स्क्वेअर फुट जागेवर कोलकत्याच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे दोन मजली फिश मार्केट उभारले. उभारणीनंतर कोलकातानंतर भारतात हे दुसऱ्या क्रमांकाचे आंतरराष्ट्रीय फिश मार्केट असल्याचा गवगवा करत मोठ्या थाटामाटात उद्घाटन करण्यात आले. मात्र महापालिकेच्या सुस्त कारभारामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम काही दूर झाला नाही. धक्कादायक बाब म्हणजे या मार्केटभोवती चारही बाजूंनी अतिक्रमणांचा वेढा असून रस्त्याची देखील पार चाळणी झालेली आहे.
एकीकडे कोट्यवधी रूपये खर्च करून फिश मार्केट बांधलेले असताना दुसरीकडे
जकातनाका, मुकुंदवाडी, उस्मानपूरा, सुतगिरणीचौक, हर्सुल टी पाॅईंट परिसर, जळगाव रोड, चिकलठाणा आदी परिसरात उघड्यावर मांसविक्री जोरात सुरू आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फिश मार्केट ओस पडले आहे. यासंदर्भात प्रतिनिधीने सलग आठ दिवस शहरात पाहणी केली असता तसेच फिश, मटन आणि चिकन विक्रेते आणि ग्राहकांशी संवाद साधला असता शहराची वाढती लोकसंख्या व शहराचा वाढता विस्तार लक्षात घेता शहागंजच्या धर्तीवर अजून विविध भागात बंदिस्त फिश, चिकन व मटन मार्केटची उभारणी करणे आवश्यक असल्याची बाब समोर आली. तर दुसरीकडे ज्या कंत्राटदाराने शहागंज मधील फिश मार्केट चालवायला घेतले आहे, त्याने कमाई चवन्नी खर्चा रुपया म्हणत रडगाणे गात दोन वर्षांत २४ लाख खिशातून घातल्याचा दावा केला आहे.
शहरात मुख्य रस्त्यांवर, बाजारपेठ व वर्दळीच्या मार्गावर उघड्यावर मांस विक्रेत्यांमुळे दुर्गंधीची समंस्या निर्माण होऊन समस्त शहरवासीयांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता. महानगरपालिकेची शहागंज वगळता कुठेही अद्ययावत मास विक्री केंद्र उपलब्ध नाही. केवळ शहागंजमध्ये असलेल्या जुन्या मार्केटमध्ये जागा अपुरी पडू लागल्याने फंक्त फिश विक्रेत्यांसाठी तत्कालीन महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी शहागंज येथील नेहरूनगर पाण्याच्या टाकीलगत महापालिकेच्या जागेचा पर्याय शोधला. तेथे १५ हजार स्क्वेअर फुट जागेवर दोन मजली अद्ययावत फिश मार्केट बांधले. कोलकात्ताच्या धर्तीवर बांधलेल्या या मार्केटमध्ये तळमजल्यात २५ ओटे व वरच्या मजल्यावर २५ ओटे आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मार्केटच्या बांधकामासाठी तब्बल दोन कोटी रूपये खर्च करण्यात आले. यासाठी राष्ट्रीय मासळी विकास बोर्डाने ९० % अनुदान महापालिकेला उपलब्ध करून दिले.पण सुरुवातीपासूनच विक्रेत्यांनी या अद्ययावत मार्केठकडे पाठ दाखवली.
सुरुवातीला पाच वर्ष मार्केट चालविण्यासाठी महानगरपालिकेच्या मालमंत्ता विभागामार्फत टेंडर पे टेंडर काढण्यात आले. मात्र एकाही कंत्राटदाराने प्रतिसाद दिला नाही. दोन वर्षांपूर्वी सेवा फिश ट्रेडिंग कंपनीने अखेर हे मार्केट चालविण्यासाठी घेतले. त्यांना वर्षाकाठी साडेसहा लाख रूपये व १८ % जीएसटी भाडे महानगरपालिकेने आकारले. मात्र शहरात फिश विक्रेते येथील मार्केटमध्ये बसायला तयार नाहीत. परिणामी दोन वर्षांपासून कंत्राटदार कंपनीला एक छदामही उत्पन्न मिळाले नाही. महानगरपालिकेने कंत्राटदाराच्या करारनाम्यातील अटीशर्तीनुसार मार्केटच्या पूर्वे , पश्चिम, दक्षिण व उत्तर दिशेच्या तीन किलोमीटर अंतरापर्यंत उघड्यावर फिश विक्री होणार नाही, जे लोक उघड्यावर फिश विक्री करतील त्यांना मार्केटमध्ये भाडेतत्वावर जागा देऊन बसविणे ही महानगरपालिकेच्या पशुसंवर्धन विभागाची जबाबदारी आहे.मात्र संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदारीचा विसर पडल्याने फिश विक्रेते बंदिस्त मार्केट मध्ये न येता खाजगी जागा अथवा अतिक्रमित जागांचा आश्रय घेत उघड्यावर फिश विक्री करतात. महापालिकेने प्रस्तावित केलेले मार्केटची जागा सोडून इतर ठिकाणी दुकाने विक्रेत्यांनी लावली आहेत. या दुकानांमुळे रस्त्यावरील कुत्र्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. महानगरपालिकेच्या शहागंज फिश मार्केटच्या परिसरातच लोक उघड्यावर फिश विक्री करतात.शहरात अनेक भागात मटण, चिकन व मासळीची दुकाने रस्त्यावर थाटण्यात आली असून उघड्यावर मांस कापण्याचे प्रकार बाजारात सर्रास सुरू आहेत. अशा अस्वच्छ जागेत मांस विक्री सुरू असल्याने नागरिकांच्या आरोग्याला त्यामुळे धोका निर्माण होत असून महानगरपालिका प्रशासन त्याकडे सर्रास दुर्लक्ष करत आहे.
अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले मार्केट
वर्दळीच्या शहागंज परिसरातील बंदिस्त मार्केट अतिक्रमणांच्या विळख्यात अडकले आहे. मोठ्याप्रमाणावर अतिक्रमण झाल्याने मार्केटकडे जाणारा रस्ता छोटा झाला आहे.त्यामुळे वाहनधारकांना फिश खरेदी करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. गत पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत ओस पडलेले येथील मार्केट पाहण्यासाठी जाणार असल्याचा सुगावा लागताच धास्तावलेल्या अतिक्रमण हटाव पथकाने थातूरमातूर कारवाई केली. मात्र पथकाने पाठ दाखवताच अतिक्रमण जैसे थे झाले. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या मार्केटभोवती अनेक व्यापाऱ्यांनी सार्वजनिक रस्त्यावर दहा बाय दहा, दहा बाय पंधरा या आकाराचे पत्र्याचे शेड उभारून अतिक्रमण केले आहे. यामुळे मार्केटकडे जाणारा ५० फूट रस्त्याचा श्वास गुदमरला आहे. याशिवाय मार्केटकडे जाणारा रस्ता देखील कच्चा असल्याने मार्केटची शोभा घालवत आहे.