मुंबई (Mumbai) : बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील ब्रम्हनाथ येळंब, टाकळगाव हिंगणी आणि निमगांव या तीन कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पांचे बॅरेजमध्ये रुपांतरीत करण्याच्या कामास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) होते. या तिन्ही कामांवर सुमारे ६० कोटी रुपयांचा खर्च करण्यास मान्यता देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी बांधलेले ब्रम्हनाथ येळंब कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नादुरुस्त होता. पूर परिस्थितीत या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे गेट्स काढणे जिकिरीचे होत असल्याने पूर नियंत्रण करताना अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर या बंधाऱ्याचे रुपांतरण बॅरेजमध्ये करण्यास शासनाने मे 2022 मध्ये तत्वत: मान्यता दिली आहे. त्याअनुषंगाने प्रकल्पीय पाणीसाठा व प्रकल्पीय सिंचन क्षेत्र पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने व सुलभ पूरनियंत्रणा करिता उभ्या उचल पद्ध्तीची द्वारे बसविण्याच्या दृष्टीने ब्रम्हनाथ येळंब बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामाच्या एकूण 17.30 कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास विस्तार व सुधारणा अंतर्गत काही अटी व शर्तीसह प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.
बीड जिल्ह्यातील टाकळगाव हिंगणी कोल्हापूर पध्दतीच्या बंधारे प्रकल्पाचे बॅरेजमध्ये रुपांतरणास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवर सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी बांधलेला टाकळगांव हिंगणी कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नादुरुस्त झाला आहे. यामुळे या बंधाऱ्याचे रुपांतरण बॅरेजमध्ये करण्यास शासनाने ऑक्टोबर, २०२१ मध्ये तत्वत: मान्यता दिलेली आहे. त्याअनुषंगाने पुरेसा पाणीसाठा व मोठ्या क्षेत्रास सिंचन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तसेच पूरनियंत्रणा करिता या टाकळगांव हिंगणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यात येणार आहे. या कामाच्या १९ कोटी ६६ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगांव कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्याच्या कामास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील निमगांव कोल्हापूर पद्धतीचा बंधारा नादुरुस्त आहे. या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये करण्यास रुपांतरणास २०२२ मध्ये मध्ये तत्वत: मान्यता दिलेली आहे. त्यामुळे या बॅरेजच्या रुपांतरणास व त्यासाठीच्या २२ कोटी ८ लाख रुपयांच्या कामांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.