Sambhajinagar
Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Chhatrapati Sambhajinagar : कोट्यवधींच्या सुशोभिकरणाचे का वाजले 'बारा'? जबाबदार कोण?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : शहरात अनेक ठिकाणी जी - २० आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्त आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीचे औचित्य साधून सुशोभीकरण करण्यात आले. सौदर्यबेट आणि वाहतूकबेटांसह दुभाजकांचे देखील सुशोभिकरण करण्यात आले होते. उड्डाणपुलांच्या भिंतींची रंगरंगोटी करण्यात आली. मात्र या कामांची सद्यस्थिती पाहिल्यास कोट्यवधींचा खर्च पाण्यात गेल्याचे दिसते आहे.

सुशोभिकरणाच्या आणि रंगरंगोटी करणाऱ्या कंत्राटदारांनी निकृष्ट दर्जाचे काम करत पालिकेचा निधी खिशात घालत चुना लावला. जी-२० परिषदेच्या निमित्ताने अवघ्या १०० कोटी रुपयांमध्ये शहराचा चेहरा मोहरा बदलून टकला होता. पुढे ही सौंदर्याची किमया जीवंत ठेवण्यासाठी दरवर्षी अर्थसंकल्पात शहर सौंदर्यीकरणासाठी ५० कोटींची तरतूद देखील करण्यात आली होती.

राज्याच्या पर्यटनाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरात दरवर्षी विविध पर्यटनस्थळे पाहण्यासाठी ४० लाखांहून अधिक पर्यटक येतात. जी-२० परिषदेच्या निमित्ताने दोन ते अडीच महिन्यांमध्ये शहरातील मुख्य रस्त्यांचा चेहरामोहराच बदलण्यात आला. गुळगुळीत रस्ते, दुभाजक, त्यामध्ये आकर्षक झाडे, फुले, रंगरंगोटी पाहून छत्रपती संभाजीनगरकरांना आश्चर्याचा धक्काच बसला होता. रात्री जालना रोडसह ऐतिहासिक दरवाजे, दुभाजक आणि सौदर्य तसेच वाहतूक बेटांवरील रोषणाई शहराच्या सौंदर्यीकरणात आकर्षण निर्माण करत होती.

राज्य शासनाने जी-२० साठी महापालिकेला ५० कोटी रुपये मंजूर केले होते. त्यामध्ये ८२ कामे करण्यात आली होती. सा. बां. विभागाला देखील शासनाने २० कोटींचा निधी मंजूर केला होता. राज्याच्या पर्यटन विभागाला देखील विविध पर्यटन स्थळांच्या सौंदर्यीकरणासाठी १६ कोटींचा निधी दिला होता. रस्ते विकास महामंडळाला देखील ५ कोटी रुपये शहर सौंदर्यीकरणासाठी मंजुर केला होता. महावितरणची देखील जी-२० मध्ये महत्त्वाची भूमिका ठरली होती. इतर विभागांनी कोट्यवधी रुपये खर्च करून रंगरंगोटी, रस्ते, फूटपाथ केल्यावर उघड्या डी.पी. आणि रस्त्यात अडसर ठरणारे विजेचे पोल त्रासदायक ठरत होते. पोलवर रंगरंगोटी, डी.पी.ला चारही बाजूने आवरण इ. कामांवर १ कोटी ७५ लाख रुपये खर्च केले होते. हा निधी महापालिकेने उपलब्ध करून दिला होता.

जी - २० परिषद पार पडल्यानंतर मराठवाडा मुक्ति संग्राम दिनानिमित्त १६ सप्टेंबर रोजी  शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी देखील तितकाच निधी खर्च केला गेला. जी - २० नंतर आणि मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त महापालिकेने बदलते छत्रपती संभाजीनगर म्हणत सुशोभिकरणावर पाण्यासारखा पैसा खर्च केला. मात्र झालेल्या कामांवर योग्यरीत्या देखभालीची अंमलबजावणी व्हावी, यासाठी महापालिका प्रशासकांनी विशेष लक्ष दिले नाही.

राज्य सरकारमार्फत जवळपास दोनशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. अवघ्या काही महिन्यांतच या सुशोभीकरणाचे तीनतेरा वाजले आहेत. शहरातील विविध ठिकाणांच्या भिंतींवर रेखाटलेल्या रंग उडालेल्या चित्रांसमोर कचराकोंडी झालेली आहे. वाहतूक आणि सौंदर्यबेटात रानटीझाडेझुडपे आणि गाजरगवत आकाशाला गवसनी घालत आहे. बहुतांश रस्त्यावरचे खड्डेही पुन्हा डोके वर काढत आहेत. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरचे पुन्हा विद्रूपीकरण होत आहे का, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करा

इतका मोठा निधी खर्च केला असतानाही या कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शहर सुशोभीकरणाअंतर्गत संरक्षक भिंती आणि दर्शनी भागातील रंगकामासाठी आतापर्यंत ४० ते ५० कोटी रुपयांचा खर्च झाला असून त्याचे देयक अदा करण्यात आलेले आहे; परंतु हे रंगकाम करताना निकृष्ट दर्जाचे रंगकाम साहित्य वापरल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून केला जात आहे. त्यांनी झालेल्या कामांचा हिशोब द्या म्हणत महापालिका प्रशासकांची कोंडी देखील केली आहे. हे निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून रंगकाम केलेल्या ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.