Gulabrao Patil Tendernama
कोकण

Vengurla-Chipi Water Scheme: 40 गावांसह चिपी विमानतळाला मिळणार मुबलक पाणी

तिलारी प्रकल्पावर आधारित दुसऱ्या टप्प्यासाठी ७८.४६ कोटी, तर पाणीपंपांचा वीज खर्च कमी करणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पासाठी १२.२५ कोटींची आवश्यकता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला - चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यात आली आहे. या योजनेसह पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी प्रस्तावित १५०० केव्हीए सौरऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर अहवाल महिनाभरात सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत.

तिलारी प्रकल्पावर आधारित वेंगुर्ला–चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला गती देण्यात आली आहे. या योजनेसह पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी प्रस्तावित १५०० केव्हीए सौरऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींचा सविस्तर अहवाल महिनाभरात सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

तिलारी प्रकल्पावरील पाणीपुरवठा योजना आणि सौरऊर्जा प्रकल्पाबाबत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासासह स्थानिक नागरिकांची पिण्याच्या पाण्याची गरज लक्षात घेता ही योजना महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित विभाग आणि वित्त विभागामार्फत सविस्तर प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

दुसऱ्या टप्प्यासाठी ७८.४६ कोटींची गरज

तिलारी धरणावरून दोडामार्ग, सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करण्याची योजना प्रगतीपथावर आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यातील दोडामार्ग ते वेंगुर्ला पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले आहे.

दुसऱ्या टप्प्यात वेंगुर्ला ते चिपी विमानतळापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. या टप्प्यासाठी ७८ कोटी ४६ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. योजना पूर्ण झाल्यानंतर सागरी किनारपट्टीवरील सुमारे ४० महसुली गावे आणि चिपी विमानतळाला पाणीपुरवठा होणार आहे.

वेंगुर्ला–चिपी परिसरात गोड्या पाण्याची उपलब्धता मर्यादित आहे. त्यामुळे परिसरातील ग्रामपंचायतींनी तिलारी योजनेतून पाणी घेण्याची तयारी दर्शवून त्यासंबंधीचे ठराव आणि प्रस्ताव शासनाकडे दिले आहेत.

सौरऊर्जा प्रकल्पासाठी १२.२५ कोटी

तिलारी पाणीपुरवठा योजनेतील पाणीपंपांचा वीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पासाठी १२ कोटी २५ लाख रुपयांची आवश्यकता असल्याचे बैठकीत सांगण्यात आले.

पाणीपुरवठा योजना आणि सौरऊर्जा प्रकल्पासाठी एकत्रितपणे ९० कोटी ७१ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. मोठ्या निधीची आवश्यकता असल्याने दोन्ही कामे विशेषतः नाबार्डच्या माध्यमातून प्रस्तावित करण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

पर्यटन आणि उद्योगांनाही फायदा

चिपी विमानतळाचा भविष्यात विस्तार झाल्यास परिसरातील पाण्याची मागणी आणखी वाढणार आहे. सध्या या भागात हॉटेल, पर्यटन आणि व्यावसायिक प्रकल्प उभारले जात असल्याने त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता भासणार आहे.

प्रस्तावित योजना पूर्ण झाल्यास स्थानिक नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासह पर्यटन आणि औद्योगिक विकासाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पाणीपट्टीच्या माध्यमातून शासनाला महसूलही मिळू शकणार आहे.

बैठकीला आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Key Points

  • वेंगुर्ला–चिपी पाणीपुरवठा योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे नियोजन.

  • प्रत्यक्ष पाहणी करून महिनाभरात सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश.

  • पाणीपुरवठा योजनेसाठी ७८.४६ कोटींची आवश्यकता.

  • १५०० केव्हीए सौरऊर्जा प्रकल्पासाठी १२.२५ कोटींची गरज.

  • दोन्ही प्रकल्पांसाठी एकत्रित ९०.७१ कोटी रुपये अपेक्षित.

  • सागरी किनारपट्टीवरील सुमारे ४० महसुली गावांना पाणीपुरवठा.

  • चिपी विमानतळासह पर्यटन आणि व्यावसायिक प्रकल्पांना फायदा.

  • मोठ्या निधीची गरज असल्याने नाबार्डच्या माध्यमातून प्रस्ताव देण्याचे नियोजन.