तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : पालघर जिल्ह्यातील वाढवण बंदराविरोधात मंत्रालयावर मोर्चा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पालघर (Palghar) जिल्ह्यातील प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात आज, सोमवारी (ता.२१) स्थानिक नागरिकांनी मुंबईत मंत्रालयावर मोर्चा काढला आहे. प्रस्तावित वाढवण बंदराला स्थानिकांचा विरोध आहे. हा विरोध तीव्र करण्यासाठी वाढवण बंदर विरोधी संघर्ष समितीने हा मोर्चा काढला आहे.

केंद्र आणि राज्य सरकारविरोधातील या आंदोलनासाठी डहाणू, पालघर भागातील शेकडो कार्यकर्ते रेल्वे लोकलमधून सकाळीच मुंबईकडे रवाना झाले आहेत. सुमारे २५ हजार कार्यकर्ते या मोर्चाला उपस्थित राहतील अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली होती. या आंदोलनाला शिवसेनेच्या ठाकरे गटानेही पाठिंबा दिला आहे. पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदर रद्द करण्यात यावे या मागणीसाठी मच्छीमार बांधव आक्रमक झाले आहेत. वाढवण बंदर प्रकल्पामुळे किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या मच्छीमार बांधवांचा पारंपारिक मच्छीमारी व्यवसाय अडचणीत येणार आहे. प्रकल्पाचा परिणाम जैवविविधतेवर होऊन माशांच्या प्रजातींनाही धोका निर्माण होणार असल्याची भीती आहे. यामुळे स्थानिक मच्छीमार बांधवांचे जनजीवन विस्कळीत होईल, यासाठी मागील काही वर्षांपासून मच्छीमार बांधव तीव्र विरोध करत आहेत. प्रस्तावित वाढवण बंदराविरोधात हजारो नागरिक मुंबईतल्या आझाद मैदानात एकत्र जमले आहेत. त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

स्थानिकांचा विरोध नेमका कशाला?
- समुद्रात सुमारे साडेपाच हजार एकरावर भराव केला जाणार आहे.
- समुद्रात भराव करण्यासाठी डहाणू पट्ट्यातील डोंगर टेकड्या तोडल्या जाणार आहेत.
- सुमारे साडेबारा किलोमीटरपर्यंत प्रवाह अडवणारी ब्रेक वॉटर बांधली जाणार आहे.
- या प्रकल्पामुळे 47 गावे आणि 261 पाडे प्रकल्प बाधित होणार आहेत.
- तारापूर अणुशक्ती केंद्रापासून अवघ्या सहा किलोमीटरमध्ये हा प्रकल्प उभा राहत आहे.
- समुद्रात भराव केल्यामुळे तारापूर अणुशक्ती केंद्रामध्ये पाणी घुसू शकते.
- प्रचंड मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल यांची आयात करण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित आहे.
- या प्रकल्पामुळे मच्छिमार, डाय मेकर, आदिवासी शेतकरी या समाजांच्या उपजीविकेवर कुऱ्हाड कोसळणार आहे.
- पालघर जिल्ह्यातील सागरी जैवविविधतेने भरभरून दिलेले ठिकाण उध्वस्त होणार आहे.
- प्रवाळ खडकांची रांग, मृदुकाय प्रवाळ, तारा मासे, स्पोंज, समुद्री पानघोडे आणि पालघर जिल्ह्यातील गोड पाण्यातील माशाचे एकमेव नैसर्गिक प्रजनन केंद्र नष्ट होणार आहे.
- प्रकल्प झाल्यास खूप मोठ्या प्रमाणावर कोळसा खनिज तेल इत्यादींची वाहतूक डहाणूमधून होणार आहे.
- पालघर बोईसरमधील एमआयडीसीचा विस्तार वाढवला जाईल.