Tagada
Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : उमरेडचे शासकीय विश्रामगृह असामाजिक तत्त्वांचा बनला अड्डा?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : अतिथी देवो भव' म्हणत नागपूर जिल्ह्यातिल उमरेड नगरीने पाहुण्यांचा पाहुणचार आणि आदरतिथ्य करीत संस्कृतीची जपवणूक केली आहे. उमरेडकर खाद्य संस्कृती जोपासत असले तरी दुसरीकडे सरकारी विश्रामगृहात आलेले अतिथी मात्र विश्रामगृहाची दयनीय अवस्था बघतात. दुरूनच 'नमस्कार' करीत आल्यापावली निराशेने परतीला निघतात.

ना खानसामा, ना स्वयंपाकगृह, कुठे छताला गळती तर इमारतसुद्धा जीर्णावस्थेत अशी दैनावस्था येथे आहे. उमरेडच्या विश्रामगृहाचा 'लूक' व 'व्यवस्था' बदलणार कधी असा सवाल विचारला जात आहे. उमरेडचे विश्रामगृह सन 1890 पासूनचे ब्रिटिशकालीन आहे. याठिकाणी एकूण चार वेगवेगळ्या सुटची (खोल्या) व्यवस्था आहे. यापैकी एका व्हीआयपी सुटमध्ये दोन एसीची व्यवस्था करण्यात आलेली आहे. हा एकमेव सुट केवळ लोकप्रतिनिधी तथा बड़े अधिकारी यांच्यासाठी उपलब्ध आहे. अन्य तीन सुटमध्ये प्रवेश करताच घुसमट होते. सोफ्यांची बैठकीची धडागतीची व्यवस्था याठिकाणी उपलब्ध नाही.

याठिकाणी प्रत्येक सुटमध्ये कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे. दुसरीकडे बेडचीही अवस्था दयनीय आहे. पाऊस झाल्यानंतर कुठे गळती लागेल याचाही नेम नाही. मुख्य इमारतीला शंभर वर्षापेक्षा अधिक काळ झाला. यामुळे ही इमारत जीर्णावस्थेत आहे. काही वर्षापूर्वी सार्वजनिक विभागाने रंगरंगोटी आणि डागडुजी करीत इमारत चमकविण्यासाठी पुढाकार घेतला. निधीच उपलब्ध होत नसल्याने विश्रामगृहाचा चेहरा बदलविणे अशक्य असल्याची कैफियत अधिकाऱ्यांची आहे. दरवर्षी निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा पाठपुरावा केला जातो. निधी उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते.

स्वयंपाकगृह झाले भंगार

उमरेडच्या विश्रामगृहात दोन कर्मचारी, खानसामा होते. त्यांची सेवा संपली. आता याठिकाणी कंत्राटी पद्धतीने दोन कर्मचारी उपलब्ध आहेत. काही वर्षांपूर्वीपर्यंत स्वयंपाकगृहातील सुगंध सभोवताल दरवळत होता. आता खानसामा नाही. स्वयंपाकगृह भंगार झाले आहे. स्वयंपाकगृहाचे छत जमिनीवर कधी कोसळेल याचा भरवसा राहिलेला नाही. अवतीभवती झाडेझुडपे, पालापाचोळा दिसून येतो. विश्रामगृहासह स्वयंपाकगृहाच्या बांधकामाची मागणी नागरिकांची आहे.

असामाजिक तत्त्वांचा अड्डा

सध्या रेल्वेच्या पुलाचे बांधकाम सुरु आहे. यामुळे ये-जा करण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागते. सभोवताल अंधाराचे साम्राज्य असल्याने असामाजिक तत्त्वांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे दिसून येते. शिवाय गाव-शहर गुंडांच्या बैठकासुद्धा घेतल्या जात असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. पूर्वी विद्युतची समस्या होती. पाहुणे आले तरी फार वेळ थांबत नाहीत. चहापाणी घेत पुढील प्रवासाला निघतात. इमारत जीर्ण झाली आहे. निधीसाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. नव्याने बांधकामाची गरज आहे. अशी माहिती सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उमरेड चे उपविभागीय अभियंतापी.आर. ताकसांडे यांनी दिली.