
पुणे (Pune) : येथील अण्णाभाऊ साठे चौक येथे पौड रस्त्यावर पाच दिवसांपूर्वी केलेले डांबरीकरण आता जल वाहिनीच्या कामासाठी पुन्हा उखडून टाकण्यात आले. या ठिकाणी जर जल वाहिनीचे काम करायचेच होते, तर डांबरीकरण केलेच कशाला असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.
याबाबत ॲड. अमोल काळे म्हणाले की, पथ विभाग व पाणीपुरवठा विभाग यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे पुणे महानगरपालिकेला आर्थिक भुर्दंड बसत असून असे प्रकार हेतुपूर्वक टेंडर काढण्यासाठी व त्यातून टक्केवारी मिळवण्यासाठी केले जातात का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा प्रकारच्या कार्यपद्धतीमुळे नागरिकांना कोणताही फायदा होत नाही. ॲड. शिवाजी भोईटे म्हणाले की, अधिकार आहे म्हणून जनतेच्या पैशाची कशीही उधळपट्टी करायची हे आता जनता सहन करणार नाही. संबंधितांनी जबाबदारीने काम करायला हवे. या कामामुळे जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई संबंधितांच्या वेतनातून घेण्यात यावी.
रमेश उभे म्हणाले की, गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ कोथरूड भागात विविध खोदकामांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. जनता या कोंडीला व खोदकामाला वैतागली आहे. या कामांचे कोणतेही नियोजन दिसत नाही. सर्व परिसराला बकालपणा आला आहे. प्रशासनाला कामाचे नियोजन करता येत नसेल, तर आता नागरिकांनाच रस्त्यावर उतरून जाब विचारावा लागेल.
यासंदर्भात आम्हाला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. पौड रस्त्यावरील २४ बाय सात पाणीपुरवठा वाहिनीचे काम थांबविण्यास सांगितले होते. तरी संबंधितांना नोटीस देऊन रस्त्याच्या नुकसानीबद्दल दंड आकारण्यात येईल.
- शैलेश वाघोलीकर, उप अभियंता, पथविभाग