
नागपूर (Nagpur) : पारशिवनी तालुक्यातील रोहना- चानकापूर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण या निधीवर शासनाने स्थगिती आणली आहे. सत्ताधाऱ्यांच्या खेळात सामान्य नागरिक मात्र, भरडले जात आहेत. या मार्गाची फार दुर्गती झाली असून रस्त्यावर जिकडेतिकडे खडे, उखडलेलो गिट्टी आणि चिखल असल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
पारशिवनी तालुक्यातील रोहना नदीवरील पूल ओलांडल्यानंतर चानकापूर मार्गावरून जाताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. करंभाड, दहेगाव, पारडी, इटगाव, निवा, सकरला या व इतर गावखेडयातून शाळकरी मुले, मुली, शासकीय कर्मचारी, शेतकरी, सामान्य नागरिक खापरखेडा, नागपूर येथे नियमित येजा करतात. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खडयांत माती बसल्याने सर्वत्र चिखल झाला. तसेच जागोजागी गिट्टी उखडल्याने दुचाकी घसरून पडत आहेत. शेतकरी वाहनाने भाजीपाला घेऊन शहराकडे जातात. त्यांच्या वाहनांना अपघात होण्याचा धोका आहे. या रस्त्यावर आतापर्यंत अनेक अपघात झाले असून कित्येकांना कायमचे अपंगत्व आले आहे. संबंधित विभागाला सारेकाही माहीत असूनही याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. अखेर जनतेला आंदोलन करावे लागले. शासनाने रोहना-चानकापूर मार्गाची चदुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी सरपंचासोबत अनेक नागरिकांनी केली आहे.
खड्ड्यांना घातले हार :
संबधित विभाग आणि पालकमंत्री काहीच करीत नसल्याने अखेर करभांड जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य अर्चना भोयर यांनी पुढाकार घेत स्थानिक नागरिकांच्या समवेत आंदोलन केले. नागरिकांनी रस्त्यावरील खड्डयांना हार घालत राज्य सरकारचा निषेध केला. रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दोन कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. पण, सरकार बदलले आणि या निधीवर स्थगिती आणली, रस्ता दुरूस्तीसारख्या निधीवर सरकारने स्थगिती थगिती आणल्याने सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. हे सरकार जनविरोधी आहे. अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य अर्चना भोयर यांनी दिली.