

मुंबई (Mumbai): बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) के-पश्चिम विभागातील सार्वजनिक ‘पे अँड यूज’ स्वच्छतागृहांच्या सर्वेक्षणात स्वच्छता व देखभालीतील गंभीर त्रुटी उघड झाल्यानंतर मुंबई भाजप अध्यक्ष व आमदार अमीत साटम यांनी मुंबईतील सुमारे ७५० सार्वजनिक स्वच्छतागृहांचेही अशाच प्रकारे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे.
के-पश्चिम विभागातील सर्वेक्षणाचा आढावा घेण्यासाठी आमदार अमीत साटम यांच्या पुढाकाराने संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर, पालिका अधिकारी, स्वच्छतागृह चालक तसेच स्थानिक प्रतिनिधी उपस्थित होते.
अंधेरी पश्चिम, वर्सोवा, लोखंडवाला आणि जोगेश्वरी या परिसरांचा समावेश असलेल्या के-पश्चिम विभागातील एकूण २८ सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करण्यात आले. यापैकी २३ स्वच्छतागृहे कार्यरत असून पाच स्वच्छतागृहे पाडण्यात आली आहेत.
या पाहणीत ९१.७ टक्के स्वच्छतागृहांच्या भिंती व फरशा अस्वच्छ असल्याचे आढळून आले. सुमारे ५० टक्के स्वच्छतागृहांमध्ये प्रकाशव्यवस्था अपुरी असल्याचे निदर्शनास आले, तर जवळपास सर्वच ठिकाणी नागरिकांच्या अभिप्रायासाठी प्रभावी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले.
या निष्कर्षांची गंभीर दखल घेत आमदार साटम म्हणाले, सर्व २३ स्वच्छतागृह चालकांना अंतिम इशारा देण्यात आला आहे. सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांचे नूतनीकरण करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचे बनविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी साटम यांनी मुंबईतील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांचे अशाच प्रकारे सर्वेक्षण करून त्यांच्या उन्नतीकरणासाठी सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश पालिका प्रशासनाला दिले.
मुंबईतील सर्व सार्वजनिक स्वच्छतागृहांचे सर्वेक्षण करून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकसित करण्यासाठी सविस्तर आराखडा तयार करण्यास प्रशासनाला सांगितले आहे, असेही ते म्हणाले.