भंडारा (Bhandara) : महात्मा गांधी यांच्या नावाने संपूर्ण देशात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते परंतु तुमसर येथे नगरपरिषदेच्या मालकीच्या एकमेव तलावाचे नाव गांधीसागर असून त्या तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग असल्याने तलावातील पाणी प्रदूषित होऊन येतील जलचर जीवजंतूंच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे.
तलावात जलपर्णी व इतर वनस्पतींची मोठी वाढ झाल्याने या तलावाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. केंद्र सरकारच्या अमृत 2.0 अंतर्गत मंजुरी करिता आराखडा पाठविण्यात आला परंतु अजूनपर्यंत मंजुरी प्रदान करण्यात आली नाही. तुमसर शहराच्या मध्यभागी गांधीसागर तलाव असून या तलावाचे क्षेत्र हे विस्तीर्ण आहे. हा तलाव जुना असून यापूर्वी या तलावाचे पाणी पिण्याकरिता वापरण्यात येत होते. या तलावामुळे परिसरातील विहिरींची पाण्याची पातळी वाढण्यास मदत होते. लक्ष वेधून घेणारा असा हा एकमेव तलाव नगरपरिषदेच्या मालकीचा आहे; परंतु नगरपरिषद प्रशासनाचे या तलावाकडे कायम दुर्लक्ष होत असल्याने या तलावाच्या अस्तित्वावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तलावाच्या काठावर कचऱ्याचे ढीग फेकल्याचे दिसून येतात त्यात प्लास्टिक मिश्रित कचरा अधिक आहे. हा तलाव इतिहासजमा तर होणार नाही ना अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे, याकडे मात्र नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत आहे.
अमृत 2.0 योजनेत समावेश :
गांधीसागर तलावाचे पुनर्जीविकरण व सौंदर्याकरण करण्याकरिता 13.70 कोटी किमतीच्या विस्तृत कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. प्रस्ताव केंद्र शासनाला सादर करण्यात आला. परंतु त्याला अजूनपर्यंत मंजुरी मिळालेली नाही. या कृती आराखड्यात तलावाचे पुनर्जीवीकरण, आवार भिंत, वृक्षलागवड, लहान मुलांकरिता खेळणी साहित्य, सुरक्षा भींत सांडपाणी प्रक्रिया केंद्र इत्यादींचा समावेश आहे.
तलाव व पर्यावरणाची हानी :
ऐतिहासिक तलाव हा विस्तीर्ण असून देखणा आहे. तलाव शहराच्या मध्यभागी असून आजूबाजूला नागरिकांची घरे आहेत. रात्री हा तलाव परिसर लक्ष वेधून घेतो. परंतु अतिशय देखण्या तलावाची येथे दुर्दशा झाली आहे. तलावात कचऱ्याचे ढीग व प्लास्टिक फेकले असल्याने तलाव व पर्यावरणाची येथे पर्यावरणाची हानी होत आहे.