नाशिक (Niphad) : निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील दळण-वळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या भरवसफाटा ते कानळद या रस्त्यासाठी केंद्रीय रस्ते विकास निधीतून कोट्यवधी रुपये निधी मंजूर झाला असूही या रस्त्याचे काम अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याची तक्रार परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. हा रस्ता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार (Dr. Bharati Pawar) यांच्या प्रयत्नातून मंजूर झाला असून, माजी पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या विधानसभा मतदार संघात आहे. या रस्त्याच्या दर्जाबाबत आजी-माजी मंत्र्यांनी लक्ष घालावे, अशी परिसरातील नागरिकांची मागणी आहे.
केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या प्रयत्नातून केंद्रीय रस्ते आणि पायाभूत सुविधांतर्गत क्रेंदीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी हा रस्ता मंजूर केला. या रस्त्यासठी ९.८२ कोटी रुपये निधी मंजूर केला. या रस्त्याचे काम वर्षभरापासून सुरू झाले आहे. पावसाळ्यात रस्त्याचे काम बंद ठेवण्यात आले होते. रस्त्याच्या कामाला महादेवनगर परिसरात सुरुवात करण्यात आली आहे. या रस्त्यावर टाकलेली खड़ी अत्यंत नित्कृष्ठ दर्जाची असल्याने तसेच रस्त्याचे खडीकरण करताना रस्त्याची खोदाई करून ही खडी व्यवस्थित न दाबताच त्यावर डांबराचा थर दिला जात आहे. यामुळे खडी, डांबर एकजीव होत नसल्याने हा रस्ता पायानेही उखडला जात आहे. यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी संबंधित ठेकेदाराकडे विचारणा केली असता आमच्याकडे रस्त्याची पाच वर्षे देखभाल दुरुस्ती असल्याचे सांगितले गेले.
केंद्र सरकारचे कोट्यवधी रुपये खर्च होऊनही रस्त्याचे काम चांगले दर्जाचे होणार नसेल व नागरिकांना चांगली सुविधा मिळणार नसेल, तर या रस्त्याचे नुतनीकरण कशासाठी केले, असा प्रश्न विचारला जात आहे. रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे शासनाचा पैसा वाया जात आहे. यामुळे भागातील लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या कामात लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
या रस्त्याने शेतमाल वाहतुकीबरोबरच राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या, शालेय विद्यार्थी, नोकरदार वर्ग येजा करीत असतात. हा रस्ते वर्षानवर्षे नादुरुस्त असल्यामुळे अनेक वर्षंपासून या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांची हेळसांड होत होती. यामुळे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्र सरकारच्या निधीतून या रस्त्यासाठी जवळपास दहा कोटी रुपये मंजूर केले. मात्र, रस्त्याचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्याच्या दर्जाबाबत कोणीही लक्ष घालण्यास तयार नाही. यामुळे स्थानिक सरपंच व पुढाऱ्यांना हाताशी धरून ठेकेदार काम रेटून नेत असल्याने सामान्य नागरिक हतबल असल्याचे चित्र आहे.