.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai): मुंबईतील नागरिकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबई गाठणे आता केवळ वेळेची बचत करणारेच नाही, तर आरामदायकही ठरणार आहे.
मुंबई मेट्रो-3 (Aqua Line) मार्गिकेचा आरे ते कफ परेड दरम्यानचा संपूर्ण भुयारी मार्ग येत्या बुधवारी (ता. 8) ऑक्टोबरला पूर्णपणे प्रवाशांसाठी खुला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते या भुयारी मेट्रोच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण केले जाणार आहे.
या मेट्रो मार्गिकेमुळे मुंबईकरांच्या प्रवासाचा वेळ लक्षणीयरित्या कमी होणार आहे. विशेषतः, मुंबई विमानतळाहून थेट कफ परेडला पोहोचण्यासाठी केवळ 45 मिनिटे लागतील. यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दक्षिण मुंबईतील मंत्रालय, विधान भवन अशा महत्त्वाच्या सरकारी कार्यालयांमध्ये जलदगतीने पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा चौक, चर्चगेट, विधान भवन यांसारख्या प्रमुख स्थानकांमुळे मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार आहे.
'अॅक्वा लाईन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेट्रो-3 मार्गिकेवर सध्या वरळीतील आचार्य अत्रे चौक स्थानकापर्यंत प्रवासी सेवा सुरू आहे. 8 ऑक्टोबरला खुल्या होणाऱ्या या अंतिम टप्प्यामध्ये वरळी सायन्स म्युझियम स्थानक ते कफ परेड पर्यंतचा मार्ग समाविष्ट आहे. या टप्प्यातील 11 भूमिगत स्थानकांवरील प्रवासी सेवा त्याच दिवशी सुरू होणार आहे.
मेट्रो-3 ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील पहिली भुयारी मेट्रो मार्गिका आहे. आरे ते कफ परेडदरम्यान या मार्गिकेवर एकूण 26 भूमिगत मेट्रो स्थानके आहेत.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने (एमएमआरसीएल) केले आहे. या भुयारी मेट्रो मार्गिकेच्या प्रकल्पासाठी जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जिका) आणि केंद्र सरकारने निधी पुरवठा केला आहे.
वेगवान प्रवासासोबतच मेट्रो-3 मध्ये आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाची पूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. महिला, वृद्ध नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव आसनांची व्यवस्था आहे. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो स्थानकांच्या इमारतींसह ट्रेनमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच ठेवण्यात आला आहे.
ही संपूर्ण मार्गिका खुली झाल्यानंतर मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल घडवून आणण्याची चिन्हे आहेत.