.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई (Mumbai) : मुंबईतील वाढत्या वाहतूक समस्यांवर ठोस उपाययोजना म्हणून पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्यक्रम देण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दरम्यान नागरी रस्ता बोगदा प्रकल्प विकसित करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीस आवश्यक त्या सर्व परवानग्या आणि पूरक उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर आहेत. या प्रकल्पास अधिक गती देण्यासाठी कालबद्ध नियोजन करावे,असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहेत. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असेही त्यांनी यावेळी निर्देश दिले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पासंदर्भात आढावा बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पी. डी’मेलो रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पूर्व मुक्तमार्ग व अटल सेतूसोबत अखंड जोडणी निर्माण करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या प्रारंभिक कामे प्रगतीपथावर असून टनेल बोरिंग मशीनचे कार्य, जमीन हस्तांतरण व पाइल फाउंडेशनची कामे वेगाने सुरू आहेत. वाहतूक विभागासोबत सातत्याने समन्वय ठेवून सुधारित तांत्रिक प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. एस. व्ही. पटेल रस्ता व मरीन ड्राइव्ह येथे आवश्यक त्या सुधारणा आणि विस्तारिकरणाची कामे नियोजनानुसार करण्यात यावीत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होणार आहे. याशिवाय प्रदूषणाच्या पातळीत घट होऊन वाहतूक व्यवस्थेला शिस्तबद्ध दिशा मिळेल. दक्षिण मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत नवा आयाम देणारा आणि आर्थिक तसेच भौगोलिक दृष्टीने शहराच्या विकासाला वेग देणारा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मुंबईतील वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होण्याबरोबर प्रवाशांच्या वेळ आणि खर्चात बचत होईल. हा प्रकल्प डिसेंबर २०२८ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करावे असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव श्रीकर परदेशी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त संजय मुखर्जी, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त महानगर आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.
ऑरेंज गेट-मरिन ड्राईव्ह अंतर केवळ पाच मिनिटांत..
पुणे, नवी मुंबई आणि ठाण्याहून दक्षिण मुंबईत येणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीएने २०१३ मध्ये १६.८ किमी लांबीचा पूर्वमुक्त मार्ग बांधला. या मार्गामुळे चेंबूर – सीएसएमटी अंतर केवळ २० ते २५ मिनिटांत पार करणे शक्य झाले आहे. मात्र ऑरेंज गेटजवळ आल्यानंतर नरिमन पॉईंटच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना वाहतूक कोंडीत अडकावे लागते. या वाहतूक कोंडीतून वाहनांची सुटका करण्यासाठी एमएमआरडीएने पूर्वमुक्त मार्ग, ऑरेंज गेट – मरिन ड्राईव्हदरम्यान भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे, नवी मुंबई, ठाण्याहून मुंबईत येणाऱ्या वाहनांना थेट दक्षिण मुंबईत पोहोचणे सोपे व्हावे या उद्देशाने हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जपानमधील मे. पडॅको कंपनीने या साडेतीन किमी लांबीच्या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार केला आहे.
प्रकल्पात 6.23 किमी लांबीच्या बोगद्यासाठी महाकाय टनल बोरिंग मशीन (टीबीएम)चा वापर होणार आहे. या बोगद्याचा व्यास 11 मीटर असणार आहे. तर, हा बोगदा जमिनीच्या पृष्ठभागापासून 15 ते 20 मीटर खाली असणार आहे. अशावेळी बोगद्याचे खोदकाम जमिनीच्या खालीच करण्यात येणार आहे. लाँचिंग सॉफ्टच्या माध्यमातून टीबीएम जमिनीच्या खाली उतरवण्यात येणार आहे. वाहनांसाठी बोगद्यात 2-2 लेन बनवण्यात येणार आहे. आपत्कालीन स्थितीत बोगद्यात आणखी 1-1 अशा लेन बनवण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गाला कनेक्ट करण्यासाठी सध्याच्या फ्रीवेच्या जवळपास वायडक्ट आणि ओपन कट मार्ग बनवण्यात आला आहे. वाहनांसाठी सिग्नल फ्री मार्ग उपलब्ध करण्यासाठी 9.23 किमी लांबीचा मार्ग तयार केला जात आहे. यात जवळपास 6.23 किमी मार्ग जमिनीच्या खाली म्हणजे अंडरग्राउंड असणार आहे. ऑरेंज गेट-मरीन ड्राईव्ह टनल प्रोजक्ट कोस्टल रोड आणि पूर्व द्रुतगतीला थेट जोडणार आहे. प्रकल्पासाठी कास्टिंग यार्डसाठी जवळपास 8 हेक्टर जमिनीची गरज भासणार आहे. बीपीटी यासाठी जमीन देण्यास तयार आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यानंतर दक्षिण मुंबईतून जाणारी वाहने थेट ट्रान्सहार्बर लिंकला जोडली जाणार आहेत. यामुळं नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे अंतर खूप कमी होणार आहे.