औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद ते जालना या राष्ट्रीय महामार्गातील साफसफाई, दुभाजक व छोट्यामोठ्या पुलांची रंगरंगोटी व लिपापोतीचे काम अखेर मंगळवारपासून सुरू झाले आहे. कंत्राटदाराकडून या रस्त्याच्या स्वच्छतेचे काम हाती घेण्यात आले असून, मात्र रस्त्यालगत वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे जाहिरात फलक आणि रस्ता शोल्डरमध्ये नर्सरी, खेळणी आणि चहानाश्त्याच्या हातगाड्या लावणाऱ्यांच्या अतिक्रमणाकडे कंत्राटदाराचा कानाडोळा असल्याचा आरोप वाहनधारक करत आहेत. स्वच्छतेसह अपघाताला आमंत्रण देणारे हे अतिक्रमन देखील तात्काळ हटवावे, अशी मागणी वाहनधारकांकडून केली जात आहे.
जी-२० च्या पार्श्वभूमीवर 'टेंडरनामा' ने सलग दोन दिवस चिकलठाणा ते शेंद्रा पुढे जालन्यातील नागेवाडी टोलनाक्यापर्यंत जालना रस्त्याची पाहणी केली होती. त्यात हा राष्ट्रीय महामार्ग गुळगुळीत असला , तरी रस्ता शोल्डरमध्ये कचर्याचे ढिग आणि वाहनांच्या धुराने काळवंडलेल्या दुभाजक आणि छोट्यामोठ्या पुलांचे कठडे यामुळे रस्त्याची शोभा कशा पध्दतीने घालवली जात आहे. यावर 'टेंडरनामा'ने सचित्र वृत्त प्रकाशित केल्यानंतर जागतिक बॅक प्रकल्प टप्पा क्रमांक - ३ चे अधिकारी जागे झाले. त्यांनी कंत्राटदार सद्भाव प्रकाश जाॅईंट व्हेंचरच्या कंत्राटदाराला सूचना दिल्या. त्यानंतर हे काम सुरू करण्यात आले.
खाजगी प्रकल्पांतर्गत औरंगाबाद - जालना रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. तब्बल १९० कोटीतून झाल्टा फाटा ते कॅम्ब्रीज चौक, चिकलठाणा विमानतळ ते जालना दरम्यान ६५. ८० कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीचा खर्च वसुल करण्यासाठी औरंगाबाद - जालना या राष्ट्रीय महामार्गावर लाडगाव आणि नागेवाडी येथे दोन ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. मुंबईच्या सद्भाव प्रकाश जाॅईंट व्हेंचर या कंत्राटदाराला १ फेब्रुवारी २००७ ते ३१ जुलै २०३० पर्यंतच्या कालावधीत टोलवसुली करून रस्त्यासाठी खर्च झालेली किंमत आणि रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
कोट्यावधीचा गल्ला, समस्यांचा कल्ला
कोट्यावधीचा गल्ला भरून देखील संबधीत कंत्राटदाराकडुन रस्त्याची स्वच्छता, दुभाजकाची व छोट्यामोठ्या पुलांची लिपापोती व रंगरंगोटी तसेच दुभाजकातील सुशोभिकरण व दिशादर्शक फलकांची रंगरंगोटी व दुरूस्ती तसेच ३० मी. रस्त्याच्या हद्दीत वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे अतिक्रमन याकडे कंत्राटदाराचे सतत दुर्लक्ष असते. शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहतीत अगदी दोन दिवसांवर येऊन ठेपलेला ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो आयोजित केला असल्याचे देखील या कंत्राटदाराला भान नव्हते. याबाबत 'टेंडरनामा'ने प्रहार करताच अधिकार्यांनी त्याला जागे केले. तात्काळ काम सुरू करण्यात आले.
काय आहेत वाहनधारकांच्या सूचना
● कॅम्ब्रीज ते नगरनाकाच्या धर्तीवर औरंगाबाद ते जालना या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने काॅक्रीट गटाराचे काम व्हावे. त्यावर फुटपाथ बांधला जावा.जेणेकरून रस्त्यावर पावसाचे पाणी साचून रस्ता खराब होणार नाही.
● रस्त्याच्या दुभाजकात सुभोभिकरण केवळ टेंडरची पुर्तता करण्यासाठी नावालाच ठराविक अंतरात बारीक रोपटे लावलेले आहेत. त्यात पाणी ओतले जात नसल्याने ते देखील वाळलेले आहेत. चांगले सुशोभिकरण करावे.
● रस्त्याच्या दोन्ही बाजुने भारतीय वंशाची वड, पिंपळ, औदुंबर , चिंच , गुलमोहराची झाडे लावावीत
● दुभाजकाची उंची वाढवावी. पादचार्याला सहज ओलांडता येईल अशा उंचीचा दुभाजक असल्याने अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे.शिवाय रस्ता दुतर्फा कचर्याच्या ढिगारात अन्नाच्या शोधात भरकटनार्या प्राण्यांचा रस्त्यावर वावर असल्याने अपघाताच्या चिंतेत भर पडली आहे. यासाठी दुभाजकाची उंची वाढवणे गरजेचे.
● औरंगाबाद - जालना आता दोन्ही शहराच्या मधोमध आल्याने व शेंद्रा पंचतारांकीत औद्योगिक वसाहत, डीएमआयसी, ऑरिक सिटीचा टप्पा वाढल्याने याभागात मोठ्या प्रमाणावर मोठमोठे गृहप्रकल्प साकार होत आहेत. यात रात्रपाळी काम करणारे कामगार , कंपनी अधिकारी व उद्योजकांचा प्रवास वाढल्याने पथदिवे लावावेत.दिशादर्शक फलकांची दुरूस्ती करावी.