
औरंगाबाद (Aurangabad) : मागील सहा वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या (Road Work) निकृष्ट कामाच्या तक्रारी 'टेंडरनामा'कडे प्रवाशांनी केल्या होत्या. 'टेंडरनामा'ने याची गांभीर्याने दखल घेऊन सलग दोन दिवस औरंगाबाद ते फुलंब्री, फुलंब्री ते सिल्लोड, सिल्लोड दरम्यान दोन्ही बाजूने थेट १५० किमी पाहणी केली. त्यावर वृत्तमालिका प्रसिद्ध केली. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांपासून बांधकाम मंत्री केंद्रीय मंत्री, केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागातील संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांपासून मुख्य अभियंत्यांकडे वृत्तमालिका पाठवत पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर यापूर्वी औरंगाबाद, जालना व धुळ्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी केली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी देखील पाहणी केली होती.
आता जिल्हाधिकाऱ्यांनी घाम फोडला
त्यानंतर आज गुरूवारी औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, ठेकेदार व प्रकल्प सल्लागाराच्या अधिकार्यांना धारेवर धरत अक्षरक्षः घाम फोडला, त्याचा हा खास लाइव्ह ग्राउंड रिपोर्ट. गुरूवारी (ता. २९) सकाळी अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागार समितीच्या सदस्यांसह औरंगाबादेतील हर्सूल टी पाॅईंटपासून पाहणी करायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत औरंगाबाद विभागाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे, जालन्याचे विक्रांत शिरभाते तसेच धुळ्याचे विकास महाले, गजानन कामेकर व स्टुप या प्रकल्प सल्लागार समितीचे विजय भिलवाडे, ठेकेदार प्रतिनिधी प्रमोद राठोड उपस्थित होते.थेट हर्सुल टी पाॅईंटपासून तब्बल हर्सुल जुना जकात नाक्यापर्यंत दोन किमी पायी चालत त्यांनी रस्त्याच्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून अधिकार्यांशी चर्चा केली. त्यानंतर औरंगाबाद ते फर्दापूरपर्यंत रस्त्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान एक धार्मिकस्थळ आणि कब्रस्तानचा अडथळा असल्याने येथे रस्त्याचे काम सुरू करताना पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. तरीही येत्या आठ दिवसात अर्धवट रस्त्याचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे आणि आर. के. कन्सट्रक्शन कंपनीचे प्रतिनिधी प्रतिनिधी प्रमोद राठोड यांनी दिली. हर्सुल टी पाईंटते हर्सूल गावाकडे जाणाऱ्या दुभाजकात आम्ही काळी माती टाकणार आहोत, मात्र सुशोभिकरणाचे काम मनपा करणार असल्याचे सोनवने यांनी सांगितले. हर्सुल गावातील रुंदीकरणाबाबत शासनाने सोळा कोटीचा निधी अद्याप दिला नसल्याने भूसंपादनाअभावी काम रखडल्याने एसडीएम रामेश्वर रोडगे यांनी सांगितले. त्यावर तातडीने सरकारला ही बाब कळवा असे जिल्हाधिकारी म्हणाले. पुढे हर्सुल-सावंगी तळ्यासमोरील तसेच चौकाघाट, महाकिन्होळा छोट्या पुलाचे व तीनशे मीटर ॲप्रोच रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्याच्या सुचना केल्या. पुढे निल्लोड ते सिल्लोड सात किमी व अजिंठा घाटाचे काम देखील तातडीने मार्गी लावण्याचे आदेश धुळे विभागाचे कार्यकारी अभियंता विकास महाले यांना दिले.पुढे फर्दापुर ते जळगाव दरम्यान वाकोद, पहुर, नेरी, उमाळे गाडेगावातील अर्धवट कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर अद्याप जागेचे भूसंपादन झाले नाही. जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या हद्दीत हा मार्ग येतो. जागेचा ताबा मिळवण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू असल्याचे जालना विभागाचे कार्यकारी अभियंता विक्रांत शिरभाते यांनी सांगितले. केवळ दोन किमीचे काम बाकी आहे. ताबा मिळताच तातडीने काम सुरू करणार असल्याचे ते म्हणाले.
काँक्रिटऐवजी करणार डांबरीकरण
तूर्तास विदेशी पाहुण्यांचे आगमन आणि काँक्रिट कामाच्या कालावधीला २८ दिवस क्युरिंग पिरेड लागत असल्याने सध्या विदेशी पाहुण्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी जिथे जिथे लहान-मोठ्या पुलांजवळील जोड रस्त्यांची अर्धवट काम आहेत. तिथे डांबरीकरण करून दिले जाईल, असे अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. याशिवाय जिथे जिथे सुशोभिकरण करणे शक्य आहे तेथे आवश्यक पूर्ण केले जाईल असेही अधिकारी म्हणाले. पुढे निल्लोड फाटा ते सिल्लोड बायपास येथील ७ किमीचे व अजिंठा घाटातील २ किमीचे काम धुळे विभागाकडे आहे. यावर खटोड कन्स्ट्रक्शन कंपनीची रस्ता बांधकामासाठी नियुक्ती केली आहे. दरम्यान, या अर्धवट काॅंक्रिट रस्त्याचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण करण्याचे कडक आदेश धुळ्याचे कार्यकारी अभियंता विकास महाले, गजानन कामेकर व खटोड कन्सट्रक्शन कंपनीला दिले.