
Aurangabad
Tendernama
औरंगाबाद (Aurangabad) : ऐतिहासिक आणि औद्योगिक पंढरी म्हणून देशविदेशात गौरव केले जात असलेल्या औरंगाबाद शहरातील मध्यवर्ती बसस्थानकाचे २०१९ मध्ये नुतनीकरणाचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. मात्र, नुतनीकरण कागदावरच झाले. दुसरीकडे बस स्थानकाच्या परिसरात असलेल्या व्यवस्थेच्या खड्ड्यांमधून बसेस चालवताना चालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. पावसाळ्यात तर स्थानकाला गाळयुक्त पाण्यामुळे शिवाराचे स्वरूप तलावासारखे झालेले दिसते. त्यामुळे आधूनिक बसस्थानक कराल तेव्हा करा निदान बसस्थानक खड्डेमुक्त करा अशी ओरड प्रवाशातून होत आहे.
बसस्थानकात रस्ता कमी खड्डे जास्त
बसस्थानकात रस्ता कमी खड्डे जास्त असल्याने प्रवाशांची कसरत वाढली आहे. त्यात अवकाळी पावसाचे ढग आकाशात दिसू लागल्याने खड्ड्यातील डबक्यांमुळे परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त होण्याआधी खड्डे बुजवण्याची मागणी प्रवाशातून होत आहे.
भूमिपूजन थाटात; रस्ते कोमात
जुन्या बस स्थानकाची इमारत पाडून नव्या आधुनिक बसस्थानकाच्या इमारतीचा भूमिपूजन समारंभ १३ ऑगस्ट २०१९ ला माजी मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते पार पडला. मात्र गेल्या तीन वर्षापासून आधुनिक बसस्थानक लालफितीत अडकले आहे. बसस्थानकाच्या परिसरात असलेल्या खड्यांमधून बसेस काढताना चालकांची कसरत वाढली आहे. पावसाळ्यानंतर स्थानकाला गाळयुक्त पाण्यामुळे शिवाराचे स्वरूप तलावासारखे होते.
अधिकाऱ्यांचे मुख्यालयाकडे बोट
त्याला जबाबदार असलेले अधिकारी ऐकमेकांवर चिखलफेक करून वेळ मारून नेत आहेत. तर लोकप्रतिनिधी व प्रवाशी संघटना त्याकडे पुर्णपणे दुर्लक्ष्य करीत असल्याने ग्रामस्थ आणि प्रवासी या परिस्थितीबद्दल नीव्र नाराजी व्यक्त करीत आहे.
१८ कोटीतून होणार होता कायापालट
बसस्थानकाचे १८ कोटीतून रूपडे पालटणार होते. त्यात काँक्रीट रस्ते , पाथवे आदी कामे मंजूर झाली होती. मात्र महापालिका नगररचना आणि एस.टी.महामंडळातर्फे पाठपुरावा करणार्या अधिकार्यांच्या बेजबाबदार कारभारामुळे बसस्थानका नुतनीकरणासाठी काढलेले टेंडर रद्द झाले. यात विकास आराखड्यासाठी नियुक्त केलेल्या प्रकल्प सल्लागारासाठी केलेला खर्च देखील वाया गेला.यात रस्त्यांचे काम झाले असे.एस.टी.महामंडळातील काही अधिकार्यांचे म्हणणे आहे.
अपघातात भर
बसस्थानकाच्या आवारात खड्ड्याचे आकार दिवसेंदिवस वाढत आहे. जाड बारीक खडी बाहेर पडली आहे. त्यामुळे काहीना खड्ड्यांचे अंदाज न आल्याने अपघात देखील घडत आहेत.
पावसाळ्यात नदी ओलांडल्याची प्रचिती
पावसाळ्यात येथील खड्डे पाण्याने भरल्याने बसमध्ये चढल्यानंतर प्रवाशांना नदी ओलांडल्याची प्रचिती येते. एवढ्या मोठ्या प्रमाणात खड्यांनी स्थानकाला वेढा दिला असल्याने स्थानकाचा परिसर जलमय आणि कचऱ्याने गाळयुक्त होतो.
मागील अनेक वर्षांपासून हिच अवस्था
आधी मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. जागेअभावी येथील बसपोर्ट सिडकोत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आधुनिक बसस्थानकाचे टेंडर देखील रद्द झाले. काम होणार म्हणून अधिकाऱ्यांनी बसस्थानकातील रस्ते दुरूस्तीकडे सलग दहा वर्ष दुर्लक्ष केले. गेल्या वर्षी पावसाळ्यात अगदी महापूर येऊन गेल्यानंतरचे चित्र स्थानकात पाहवयास मिळाले. वाळूचे वाहन नदीतून बाहेर काढल्यासारखी बस या पाण्यातून स्थानकात आत-बाहेर न्यावी लागत असे.
कागदावर अधिक, रस्त्यावर कमी
कधी बसपोर्ट तर कधी आधुनिक बसस्थानकाच्या बांधकामाचे कारण दाखवत अधिकाऱ्यांनी बसस्थानकातील रस्त्यांची प्रतिवर्षी दुरूस्ती, डागडुगीच्या नावाखाली मुरूममाती टाकून थातूर-मातूर दुरूस्ती केली गेली. ती प्रत्यक्षात कमी अन् कागदावरच जास्त होत असल्याचे झालेल्या कामावरून दिसून येते.
तालुक्याला ९ आमदार; चित्र बदलेले कधी?
विशेष म्हणजे औरंगाबाद तालुक्याला ९ आमदार असून देखील हे चित्र कधी पालटणार अशी चर्चा प्रवाशी करीत आहे. अनेकदा आंदोलने झाली. खड्यात वृक्षारोपण झाले. यावर केवळ मुरुमाचा मुलामा केला जातो आणि आणखीच परिस्थिती वाईट होत जाते. मुरुम टाकल्याने चिखल होतो व वाहने देखील फसतात. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून केली आहे.