गोंदिया (Gondia) : सालेकसा ते नानव्हा दरम्यान कुआढास नाल्यावर असलेला पूल अतिशय धोकादायक असून, या पुलाने पावसाळ्यात अनेकांच्या बळी घेतला आहे. नवीन पुलाच्या बांधकामासाठी वारंवार मागणी करूनही लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केले आहे. सरकारने नवीन पुलासाठी निधी मंजूर केला नाही. त्यामुळे या पुलावर आणखी किती बळी जाण्याची प्रतीक्षा आहे, असा संतप्त सवाल नानव्हा परिसरातील गावकरी करीत आहेत.
गडमाता मंदिर पहाडाच्या पायथ्याशी वाहत असलेला कुआढास नाल्यावर सालेकसा ते नानव्हादरम्यान असलेल्या मार्गावर हा पूल अतिशय जीर्ण झाला आहे. पुलाची उंची खूपच कमी असल्यामुळे पावसाळ्यात हा मार्ग पूर्णपणे बंद होऊन जातो, एवढेच नव्हे, तर पुलावर कथडे नसल्याने वर्षभर धोकादायक ठरत आहे.
अनेक प्रवाशांना पुलावरून खाली पडल्याची घटना घडली आहे. पावसाळ्यात या पुलावर ये-जा करणे कठीण होते. पाणी वाहत असताना पूल ओलांडण्याच्या प्रयत्न केल्यास त्याचा जीव गेल्याशिवाय राहिला नाही. त्यामुळे या पुलावरून जाणे म्हणजे जीव धोक्यात टाकण्यासारखे झाले आहे. अशात या नाल्यावर नवीन उंच पूल बांधण्यासाठी मागील दहा वर्षांपासून सतत मागणी केली जात आहे. याकडे शासन प्रशासनाने लक्ष दिलेच नाही तर लोकप्रतिनिधींनीसुद्धा याकडे दुर्लक्ष केले आहे.
परिणामी या पुलाची समस्या कायम आहे. मागील पंधरा वर्षांत तीन वेळा आमदार बदलले. दोन वेळा खासदार बदलले. या पुलासाठी आमदार ते खासदार आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांपर्यंत धाव घेतली तरीसुद्धा लोकप्रतिनिधी व प्रशासनातील जबाबदार व्यक्तींनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या पुलाच्या धोका कायम आहे.
पुलाअभावी या गावांना बसतो फटका :
सालेकसा ते नानव्हादरम्यान नाल्यावर उंच पुलाअभावी सर्वसामान्य प्रवाशांसह विद्यार्थी, शेतकरी, भाजीपाला विक्रेते, कर्मचारी यांनासुद्धा येण्या जाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. नानव्हा, घोंसी, दरबडा, धानोली, भन्सुला, खोलगड, गरुटोला, बिंझली, पिपरटोला या गावांना या पुलाचा फटका बसतो.
नानव्हावरून सालेकसा येथे शिक्षण घेण्यासाठी सायकलने प्रवास करीत असताना या पुलावरून प्रवास नेहमी धोकादायक असतो. तर पावसाळ्यात पुलावरून पाणी वाहत असताना अनेक दिवस महाविद्यालयात जाता येत नाही, अशी प्रतिक्रिया शीतल शेंडे या विद्यार्थिनीने व्यक्त केली.
मागील दहा वर्षांपासून नवीन पुलासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सतत पाठपुरावा केला जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडे सुद्धा सातत्याने निवेदने देण्यात आली; परंतु नवीन पुलाची मागणी पूर्ण झाली नाही. आता गावात प्रचारासाठी येणाऱ्या उमेदवारांना जाब विचारला जाईल, असे सरपंच गौरीशंकर बिसेन यांनी सांगितले.