चंद्रपूर (Chandrapur) : बल्लारपूर तालुक्यात ग्रामीण भागात मागील पाच वर्षांपासून घरकुलांची कामे सुरू असून, दोन हजार 17 पैकी एक हजार 223 घरकुलांचे काम झाले आहे, तर 386 घरकुलांचे काम प्रलंबित आहे. घरकुलासाठी मिळणारे अल्प अनुदान अपूर्ण घरकुलाला कारणीभूत असल्याचे दिसून येत आहे. आता नव्या वर्षापासून तरी घरकुलासाठी अनुदान वाढविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व इतर पात्र लाभार्थ्यांना 2017 ते 2023 या कालावधीत बल्लारपूर तालुक्यातील 636 घरकुले मंजूर करण्यात आली. यापैकी 511 घरकुले पूर्ण झाली तर 55 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. अनुसूचित जातीसाठी रमाई घरकुल योजनेच्या पाच वर्षांतील 868 घरकुलांपैकी 531 घरकुले मंजूर झाली व 34 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच शबरी घरकुल योजनेमध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी 513 घरकुलांपैकी 181 घरकुलांचे काम पूर्ण केले तर 178 घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
याशिवाय नव्याने सुरू झालेल्या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेसाठी तालुक्यात 257 घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी मानोरा, इटोली, गिलबिली, कोठारी, विसापूर व इतर गावांत घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे.
संपूर्ण तालुक्यात चार घरकुल योजनांच्या माध्यमातून 2 हजार 274 घरकुलांचे उद्दिष्ट असून, एक हजार 223 घरकुले पूर्ण झाले आहेत. 386 लाभार्थ्यांनी पहिला हप्ता घेतला, परंतु घरकुलाचे काम सुरू केलेले नाही.
कमी अनुदानात घर होईना :
ग्रामीण भागात सध्या लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपये अनुदान दिले जाते. तर शहरी भागात घरकुलासाठी अडीच लाख रुपये अनुदान दिले जाते. यामुळे मिळत असलेल्या कमी अनुदानात घर बांधायचे तरी कसे? अनुदानापेक्षा बांधकाम साहित्याचा खर्च अधिक होतो आहे. त्यामुळे गोरगरिबांच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार कसे? असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांकडून उपस्थित होत आहे. नवीन वर्षात अनुदान वाढविण्याची मागणी होत आहे.
पहिला हप्ता घेऊन 12 महिन्यांच्या आत घरकुलाचे बांधकाम करायचे असते. परंतु, ज्यांनी घराचे काम सुरू केले नाही, त्यांना मुदतवाढ देण्यात येते. अशा लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे, अशी माहिती पंचायत समिती, बल्लारपूरचे गृहनिर्माण अभियंता प्रमोद शास्त्रकार यांनी दिली.
पाट्याविना घर
नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर त्या घरावर कोणत्या योजनेंतर्गत बांधकाम झाले आहे, याची पाटी लावण्यात येते. परंतु, तालुक्यातील पूर्ण झालेल्या कोणत्याही घरावर पाटी लावण्यात आलेली नाही, हे विशेष.