भंडारा (Bhandara) : राष्ट्रीय महामार्गावरून जुना कारधा पूल रिंगरोडकडे जाणाऱ्या वळण मार्गावर पुलाचे तसेच संरक्षक भिंतीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. दोन महिन्यांपासून येथे बांधकाम सुरू आहे. परंतु, बांधकामादरम्यान बाजूनेच तयार केलेल्या कच्च्या रस्त्यावर पाणी मारले जात नाही. केवळ बांधकाम सुरू असलेल्या थोड्याशा भागात पाणी शिंपडले जात आहे. परिणामी अवजड वाहनांमुळे उडणाऱ्या धुळीने वाहतूकदार त्रस्त आहेत. भंडारा शहराच्या रिंगरोडलगत संरक्षक भिंतीचे, तसेच पुलाचे बांधकाम सुरू आहे.
मातीचा भराव टाकून संरक्षक भिंत बांधली जात आहे. यासोबतच पुराचे पाणी खोलगट भागात साठून राहू नये, पाण्याची निकासी व्हावी यासाठी सिमेंट पायऱ्यांचे बांधकाम सुरू आहे. बांधकामासाठी बाजूने कच्चा रस्ता तयार करण्यात आला. या बांधकामाशेजारून वैनगंगा मोक्षधाम येथे जाण्याचा मार्ग आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे जाणारी वाहतूक या मार्गावरून वळत असते.
बीटीबी सब्जी मंडी याच भागात असल्याने वाहनांची वर्दळ असते. परंतु, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ साचली आहे. अवजड वाहन रस्त्यांवरून जाताच धुळीचे लोळ आकाशात उडतात. परिणामी श्वास घेण्यास अडचणींचा सामना करावा लागतो. त्याचबरोबर कपड्यांवर धूळ साचून मळतात.
संबंधित विभागाने व कंत्राटदाराने नागरिकांची होणारी गैरसोय व रस्त्यावर उडणाऱ्या धुळीवर प्रतिबंध लावण्यासाठी कच्च्या रस्त्यासह बीटीबीपर्यंत पाणी शिंपडण्याची सुविधा करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित कंत्राटदाराने यासाठी पुढाकार घ्यावा, वाहतूक दारांच्या त्रासाची जाणीव ठेवावी, अशी मागणी या भागातील वाहतूकदारांकडून होत आहे.
रिंगरोडवरील वाहतूक प्रभावित
जुन्या कारधा पुलाजवळील रिंगरोड वळणावर सध्या पूल व संरक्षक भिंतीचे बांधकाम सुरू आहे. ठिकठिकाणी उंचसखल भाग तयार झाले आहेत. शिवाय अवजड वाहन कच्च्या रस्त्यावरून जाताच धुळीचे लोळ हवेत उडतात. याशिवाय अवजड वाहन रिंगरोडवर चढविताना वाहनाचे नुकसान होण्याचा धोका संभवत असल्याने रिंगरोडवरील वाहतूक प्रभावित झाली आहे.