

मुंबई (Mumbai): अमरावती शहरातील वाहतुकीसाठी राजकमल रेल्वे उड्डाणपूल हा महत्वाचा पूल आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या या पुलाचे आयुष्यमान संपल्याने या पुलाची पुनर्बांधणी करणे प्रस्तावित आहे. या उड्डाण पुलाच्या पुनर्बांधणीसाठी १२५ कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.
मंत्री भोसले म्हणाले, हा लोखंडी पूल आहे. या पुलाची सध्याची स्थिती लक्षात घेऊन या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या पुलाची पुनर्बांधणी करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्राधान्य दिले आहे.
या पुलाची तात्पुरती देखभाल दुरुस्ती करून हलक्या वाहनांची या पुलावरून वाहतूक सुरू करण्यासंदर्भात अभ्यास करून निर्णय घेतला जाईल असे मंत्री भोसले यांनी सांगितले.
तसेच या पुलाच्या पुनर्बांधणीच्या कामासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात निधीची तरतूद केली जाईल, असे मंत्री भोसले यांनी सांगितले. आमदार संजय खोडके यांनी हिवाळी अधिवेशनात या पुलाच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.