
नाशिक (Nashik) : स्वच्छ शहर स्पर्धेत मागील दोन वर्षांच्या तुलनेत नाशिक शहराचा क्रमांक घसरून २० पर्यंत खाली आला आहे, तर तीन वर्षांच्या तुलनेत नऊ अंकानी घसरण झाली आहे. त्याचप्रमाणे राज्यातील स्वच्छ शहरांच्या क्रमवारीतही नाशिकची घसरण झाली आहे. या घसरणीला सर्टिफिकेशन ऑफ वॉटर प्लस श्रेणीत कमी गुण मिळाल्याचे कारण महापालिकेकडून दिले जात आहे. (Swachh Bharat Mission - Nashik Ranking).
मुळात वॉर्ड, प्रभाग अथवा शहरातील घरे, व्यापारी संकुले, नाले, उद्योग यांच्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाणी, मलजलावरील प्रक्रियेनंतरच्या दर्जानुसार वॉटर प्लस सर्टिफिकेशन दिले जाते, असे स्वच्छ भारत मिशनच्या संकेतस्थळावर नमूद केले आहे. यामुळे यामुळे नदी स्वच्छता व मलजल प्रक्रियेच्या बाबतीत महापालिकेचे कामकाज समाधानकारक नसल्यामुळेच ही घसरण झाल्याचे समोर आले आहे. एकप्रकारे स्वच्छ शहर स्पर्धेत नाशिक महापालिकेच्या नदी स्वच्छतेचा पंचनामा झाल्याचे मानले जात आहे.
केंद्रिय गृहनिर्माण व शहर विकास मंत्रालयातर्फे दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेतली जाते. यावर्षाच्या स्पर्धेचा निकाल नवी दिल्ली येथे जाहीर झाला असून त्यात नाशिक शहर देशात २० व्या क्रमांकावर आहे. स्वच्छ शहरांमध्ये नाशिकचा क्रमांक १७ वा होता, आता त्यात घसरण होऊन क्रमांक २० वा आला आहे. देशात स्वच्छ शहरांची स्पर्धा २०१६ पासून घेण्यात येत असून तेव्हा पहिल्या स्पर्धेत नाशिकचा क्रमांक ३७ वा होता. त्याच्या दुसऱ्या वर्षी म्हणजे २०१७ मध्ये या स्पर्धेतील शहरांची संख्या वाढल्याने नाशिक १५१ व्या क्रमांकावर गेले. नंतर पुढचे तीन वर्षे म्हणजे २०१८, २०१९ व २०२० मध्ये हा क्रमांक अनुक्रमे ६३, ६७ व २० वा राहिला.
शहर स्वच्छता स्पर्धेत प्रामुख्याने सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेस, सर्टिफिकेशन ऑफ वॉटर प्लस व सिटीझन फिडबॅक या तीन मुद्द्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे हे कमांक जाहीर केले आहेत. या तीन मुद्यांमध्ये नाशिक महपालिकेला सर्व्हिस लेव्हल प्रोग्रेसमध्ये २४०० पैकी २२५८.६२ गुण मिळले आहेत, तर सिटिझन फीडबॅकमध्ये १८०० पैकी १७३३.२४ गुण मिळाले आहेत. मात्र, सर्टिफिकेशन ऑफ वॉटर प्लस या गटात नाशिक महापालिकेला खूपच कमी म्हणजे १८०० पैकी हजार गुण मिळाले आहेत. वॉटर प्लसमध्ये वॉर्ड, प्रभाग वा शहराने घरगुती, व्यावसायिक व उद्योगांमधून बाहेर पडणारे सांडपाणी, मलजल यांच्यावर प्रक्रिया करून ते नदीत सोडण्यापूर्वीचा दर्जा विचारात घेतला जातो. त्यानुसार संबंधित शहराला वॉटर प्लस सर्टिफिकेट दिले जाते. नाशिक शहरातील सांडपाणी व मलजलावर प्रक्रिया करून ते पाणी पुन्हा गोदावरीत सोडले जाते. यासाठी नाशिक शहरात ११ ठिकाणी मलनिस्सारण केद्र उभारले असून त्यांच्या एकत्रित क्षमता प्रतिदिन ३९२.५ दशलक्ष लिटर आहे. या ११ मलनिस्सारण केंद्रांमध्ये रोज ३५५ दशलक्ष लिटर मलजलाचे शुद्धीकरण करून ते गोदावरीत सोडले जाते, असे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून सांगितले जाते.
प्रत्यक्षात नाशिक शहरातील उद्योग व घरगुती वापरातून तयार होणारे सांडपाणी अनेक ठिकाणी गोदावरीत मिसळले जात असल्याने गोदावरीत पाणवेलींचे प्रमाण वाढत असते. यावर उपाय म्हणून महापालिकेने जलपर्णी काढण्यासाठी यंत्र खरेदी केले आहेत. तसेच नाशिक महापालिकेच्या हद्दीबाहेर नाशिक व निफाड तालुक्यात गोदावरी नदीत पाणवेलींची संख्या प्रचंड असल्याने तेथील पाण्याचा दर्जा खालावल्याच्या तक्रारी गोदाकाठावरील ग्रामपंचायतींकडून होत असतात. याबाबत महापालिकेकडून आम्ही प्रक्रिया केलेले मलजल गोदावरीत सोडत असतो, असा दावा केला जात असला, तरी स्वच्छ शहर स्पर्धेतील वॉटर प्लसच्या मुद्यामध्ये महापालिकेला मिळालेल्या कमी गुणामुळे महापालिकेच्या मलनिस्सारण केंद्रांचा दर्जा उघडा पडला आहे.