

नाशिक (Nashik) : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भारतीय रेल्वेकडून नाशिक व निफाडमधील पाच रेल्वे स्थानकांवर प्रवाशांसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जात आहेत. रेल्वेकडून या पाच स्थानकांवर १,२०० कोटी रुपयांची कामे मंजूर केली आहेत.
या कामांमध्ये प्रामुख्याने नवीन फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म रुंदीकरण, फ्लॅटफॉर्मची लांबी वाढवणे, लूप लाईन्स वाढवणे, ऑटोमॅटिक सिग्नलिंग बसवणे व नवीन पिटलाइन्स बांधणे ही कामे सुरू आहेत. याशिवाय आवश्यक तेथे नेटवर्क रिमॉडेलिंग करून ते स्वयंचलित केले जाणार आहे. यामुळे देवळाली, नाशिकरोड, ओढा, कसबे-सुकेणे आणि खेरवाडी (निफाड) या स्थानकांचा विकास होणार आहे.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ कुंभमेळा २०२७ मध्ये होत असून या सिंहस्थात भाविकांची संख्या मागील सिंहस्थाच्या तुलनेत चार ते पाच पटीने वाढणार असल्याचे लक्षात घेऊन पायाभूत सुविधांची उभारणी केली जात आहे. रेल्वे विभागानेही यावेळी रेल्वेद्वारे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार हे लक्षात घेऊन नियोजन केले आहे.
नाशिकला मध्य भारत, पूर्वभारत,पश्चिम भारत व मुंबई मार्गाने रेल्वे गाड्यांमधून भाविक येतील. या सर्व गाड्यांची व्यवस्था एकाच रेल्वे स्थानकावर करता येणे शक्य नसल्याने रेल्वे मंत्रालयाने पाच रेल्वे स्थानकांवर गर्दीचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाशिकरोड, देवळाली कॅम्प, ओढा, खेरवाडी व सुकेणे या स्थानकांवर पायाभूत सुविधा उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
यात देवळाली कॅम्प येथे पिट व टर्मिनस मंजूर केले आहे. या स्थानकांवर उभारण्यात येत असलेल्या बहुतांश पायाभूत सुविधा या कायमस्वरूपी असणार आहे. फारच थोड्या सुविधा या केवळ सिंहस्थापुरत्या असणार आहे. संपूर्ण पायाभूत सुविधा वेळेत तयार उभारण्यासाठी युद्धपातळीवर बांधकाम सुरू आहे, सिंहस्थ कुंभमेळा पर्वणी काळात गर्दीचे नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने येणाऱ्या रेल्वेगाड्या वेगवेगळ्या स्थानकांवर थांबवल्या जाणार आहेत. यामुळे भाविकांना परतीच्या प्रवासासाठी त्याच रेल्वे स्थानकावर जाणे सोयीचे होईल व गोंधळ टळेल.
भुसावळकडून येणाऱ्या विशेष रेल्वेगाड्या ओढा, कसबे-सुकेणे आणि खेरवाडी या स्थानकांवर थांबवण्यात येणार असून मुंबईकडून येणाऱ्या ट्रेन देवळाली स्थानकावर थांबतील व तेथूनच मार्गस्थ होतील. उर्वरित मार्गाने येणाऱ्या रेल्वेगाड्या या नाशिकरोड स्थानकावर येतील व तेथूनच मार्गस्थ होतील, असे नियोजन करण्यात येणार आहे.
रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर भाविकांना राज्य यंत्रणेकडे सोपवले जाईल. राज्य सरकारची यंत्रणा भाविकांना संबंधित स्थानकाबाहेर थांबवणे आणि नंतर नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अमृत स्नानासाठी पुढे पाठवणे याची जबाबदारी घेणार आहे. स्नान करून आल्यानंतर परतीच्या प्रवासात भाविकांना रेल्वे स्थानकाबाहेर होल्डिंग एरियात थांबवले जाणार आहे. नंतर रेल्वे गाडी उपलब्धतेनुसार त्यांना स्थानकात प्रवेश दिला जाईल.
सध्या रेल्वेची कामे वेगाने सुरू असून मार्च २०२७ पूर्वी ती पूर्ण केली जाणार आहे. रेल्वेच्या पिट सारख्या सुविधांमुळे सिंहस्थ कुंभमेळानंतर नाशिकरोड व देवळाली कॅम्प या रेल्वे स्थानकांवरून देशभरात रेल्वेगाड्या सोडता येणार आहेत. यामुळे नाशिकच्या प्रवाशांना नाशिक येथूनच सुटणाऱ्या गाड्यांमधून प्रवास करता येणार आहे.