
पुणे (Pune) : पुण्याहून हुबळी व कोल्हापूरसाठी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होऊन चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला. मात्र त्याच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आवश्यक असणारा आगार (डेपो) कुठे करायचा हेच अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे दोन वर्षांपूर्वी पुण्यासाठी मंजूर झालेला आगार करणार कुठे, हा प्रश्न सध्यातरी अनिश्चितच आहे.
रेल्वे प्रशासनाने आगारासाठी दाखविलेल्या अनास्थेमुळे येणाऱ्या काळात पुण्याहून वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
दोन वर्षांपूर्वी पुण्यातील घोरपडी येथे वंदे भारत एक्स्प्रेसच्या देखभाल व दुरुस्तीसाठी रेल्वे बोर्डाने सुमारे ९० कोटी रुपये मंजूर केले. त्याच वेळी त्याचे काम सुरू होणे अपेक्षित होते.
दरम्यानच्या काळात पुणे - सातारा रेल्वे मार्गावरील आळंदी स्थानकाजवळ आगार बांधण्याचा विचार झाला. त्यास मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील सहमती दर्शवली. मात्र त्या बाबतचा निर्णय काही झाला नाही. अजूनही आळंदी की घोरपडी हेच ठरले नसल्याने वंदे भारतचा आगार अनिश्चिततेच्या ‘ट्रॅक’वर आहे.
मध्य रेल्वेचा दुसरा डेपो
वंदे भारत एक्स्प्रेस सुरू होण्यासाठी आगार असणे ही महत्त्वाची गोष्ट आहे. याच आगारात ‘वंदे भारत’च्या डब्यांच्या देखभाल - दुरुस्तीची कामे केली जातात. ‘वंदे भारत’च्या डब्यांची रचना अन्य डब्यांप्रमाणे नसल्याने, डब्यांच्या सुरक्षेसाठी छत बनवले जाते. मध्य रेल्वेत असा आगार केवळ मुंबई विभागात आहे.
पुण्याला मंजूर झालेला आगार हा विभागातील दुसरा आगार आहे. येणाऱ्या काळात पुण्याहून सिकंदराबाद, बडोदा, नागपूर आदी ठिकाणी ‘वंदे भारत’ सुरू होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुण्यात आगार लवकर तयार होणे गरजेचे आहे.
‘वंदे भारत’च्या आगारासाठी दोन जागांचा विचार सुरू आहे. यावर अद्याप एकमत झालेले नाही. लवकरच आम्ही याबाबत निर्णय घेऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात करू.
- राकेशकुमार वर्मा, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे