
पुणे (Pune) : पुणे शहराची वाढती गरज लक्षात घेऊन पाणी कोटा वाढविण्याबरोबरच समान पाणीपुरवठा योजना, खडकवासला ते फुरसुंगी दरम्यानचा बोगदा प्रकल्प आणि खडकवासला येथे जलशुद्धीकरण प्रकल्प उभारण्यासाठी पुणे महापालिकेला अनुदान देण्यासंदर्भातील विषयांवर निर्णय घेण्यासाठी अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सभापती राम शिंदे आणि नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिले.
गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारींवर महापालिकेकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नाही. या पार्श्वभूमीवर आमदार योगेश टिळेकर यांनी मंगळवारी (ता. १८) विधान परिषदेत लक्षवेधीच्या माध्यमातून सरकारचे लक्ष वेधले.
२०१८ पासून समान पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून ते कधी पूर्ण होणार, पाण्याची बचत करणाऱ्या खडकवासला ते फुरसुंगी दरम्यान कालवा बंद करून बोगद्यातून पाणी नेण्याच्या प्रकल्पाचे काम कधी सुरू होणार आणि सिंहगड रस्त्यावरील (तानाजी मालुसरे रस्ता) गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी महापालिकेला पाचशे कोटी रुपयांचा निधी कधी वितरित करणार, याबाबत विचारणा केली.
त्यावर सभापती राम शिंदे आणि राज्यमंत्री मिसाळ यांनी पाण्यासंदर्भात अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक बोलविण्यात येईल. या बैठकीमध्ये या प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन टिळेकर यांना दिले.