
पुणे (Pune) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) हद्दीचे नियोजन करताना १८ मीटर रुंदीचे रस्ते ठेवा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यामुळे सहा नगररचना योजनांबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
या योजनांचा पुन्हा पुनर्विलोकन करून योग्य कारवाई करू, असे ‘पीएमआरडीए’चे आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. प्राधिकरणाने तयार केलेला प्रारूप विकास आराखडा नुकताच राज्य सरकारकडून रद्द करण्यात आला.
हा आराखडा रद्द करताना यापुढे हद्दीचे नियोजन करताना १८ मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित करावेत, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी फेब्रुवारीमध्ये झालेल्या बैठकीत प्राधिकरणाला केली होती. १८ मीटर रुंदीच्या रस्त्यांचा आग्रह मुख्यमंत्र्यांनी धरल्यामुळे ‘पीएमआरडीए’ प्रशासनापुढे अडचण निर्माण झाली आहे.
प्राधिकरणाकडून सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून माण-म्हाळुंगे (२५०.५० हेक्टर), मांजरी-कोलवडी (२३३.३५ हेक्टर), औताडे-हांडेवाडी (९४.७४ हेक्टर), वडाची वाडी (१३४,७९ हेक्टर), होळकरवाडी-४ (१५८.१९ हेक्टर), होळकरवाडी-५ (१३०.७८ हेक्टर), असा सहा नगररचना योजना राज्य सरकारकडे अंतिम मान्यतेसाठी पाठविल्या आहेत.
या सहाही योजनांमध्ये प्रशासनाकडून नऊ आणि बारा मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित केले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेमुळे नगररचना योजनांच्या भवितव्याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
यासंदर्भात डॉ. म्हसे म्हणाले, ‘‘सरकारकडून नगररचना योजनांना अद्याप अंतिम मान्यता दिलेली नाही. त्यामुळे त्यांचे पुनर्विलोकन करून किती मीटर रुंदीचे रस्ते प्रस्तावित केले आहेत, त्यांची माहिती घेण्यात येईल. त्यात बदल करता येत असेल, तर करता येईल.’’
रस्ते खराब झाल्यास संपर्क साधा
‘पीएमआरएडी’कडून आतापर्यंत हद्दीत केलेल्या १४० रस्त्यांच्या कामांचे ‘दोष दायित्व कालावधी’ (डीएलपी - डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) अद्याप संपलेला नाही. त्या रस्त्यांची यादी ‘पीएमआरडीए’च्या संकेतस्थळावर नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडल्यास अथवा खराब झाल्यास नागरिकांनी प्राधिकरणाशी संपर्क साधावा. त्याची ठेकेदारांकडून दुरुस्ती करण्यात येईल, असेही डॉ. म्हसे यांनी सांगितले.
पाणीपुरवठ्याबाबत स्वतंत्र बैठक
‘पीएमआरडीए’च्या हद्दीसाठी दोन टीएमसी पाण्याची गरज आहे. तेवढा कोटा मंजूर व्हावा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत केली होती. पाणीपुरवठ्याबाबत स्वतंत्र बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच स्वतंत्र बैठक होईल, असे डॉ. म्हसे म्हणाले.