
पुणे (Pune) : बंद नळाने पाणीपुरवठा करण्यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी येथील शेवाळेवाडी गावाला भेट देऊन पाहणी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गावच्या पाणीप्रश्नाबाबत विशेष दखल घेऊन महापालिका आयुक्तांना कार्यवाही करण्याची सूचना केली होती.
शेवाळेवाडी गावात सध्या महापालिकेकडून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा पाणीपुरवठा अपुरा असून रहिवाशांना तो घेताना मोठी कसरत करावी लागत आहे. टँकर चोरीचे प्रमाणही वाढले आहे. अनेक कुटुंबांना पाणी मिळतच नाही. महापालिकेत समावेश होऊनही पाण्यासाठी काही नागरिकांना वणवण फिरावे लागत आहे, तर अनेकांना हजारो रुपये पाण्यावर खर्च करावे लागत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस राहुल शेवाळे यांनी थेट मुख्यमंत्र्यांसमोर ही परिस्थिती मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ महापालिका आयुक्तांना कार्यवाहीचे आदेश दिले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, कार्यकारी अभियंता राजेश शिंदे, उपअभियंता दत्तात्रेय टकले, कनिष्ठ अभियंता सादिक पठाण, कनिष्ठ अभियंता अश्विनी वाघमारे, डीपीआर प्रमुख राजेंद्र किकले यांनी गावातील परिस्थितीची पाहणी केली. माजी सरपंच प्रतिमा शेवाळे, विजय कोद्रे, विलास शेवाळे, संजय कोद्रे, चंद्रकांत शेवाळे, मंगेश शेवाळे, बाळकृष्ण शेवाळे, मोहन कामठे, सार्थक शेवाळे, भारत कोद्रे आदी या वेळी उपस्थित होते.
माजी सरपंच प्रतिमा शेवाळे म्हणाल्या की, शेवाळेवाडी गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने घेऊन पालिका अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्यास सांगितले आहे. त्यानुसार पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी गावात पाहणी केली आहे. बंद नळाने पाणीपुरवठा योजना कशी असली पाहिजे, याबाबतचा अभ्यास अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे. गावची लोकसंख्या सध्या साधारणपणे पंचवीस हजार इतकी आहे. भविष्यात लोकसंख्या वाढतच राहणार आहे. त्यामुळे पुढील तीस वर्षांपर्यंतचे पाणीपुरवठा नियोजन होईल, अशी योजना राबविण्याची मागणी केली आहे.
शेवाळेवाडी गावाला गावाला बंद नळाने पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण सुरू केले असून, लवकरच विकास आराखडा तयार करण्यात येईल. त्याला प्रशासकीय मंजुरी घेऊन निविदा काढली जाईल. निधी प्राप्त होताच लवकरात लवकर बंद नळाने पाणीपुरवठा योजना राबवली जाईल.
- दत्तात्रेय टकले, उपअभियंता, पाणीपुरवठा विभाग