
पुणे (Pune) : फुरसुंगी येथील पाणीपुरवठा वारंवार विस्कळित होत असल्याने नागरिकांच्या चिंता वाढली आहे. पाण्याअभावी नागरिकांची गैरसोय होत असल्याने महापालिकेने या भागातील पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
एकाच महिन्यात येथील पाणीपुरवठा दोनदा विस्कळित झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महापालिका दोघांच्याही कामकाजावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.
फुरसुंगीसाठी साठवणूक टाक्यांपर्यंत पाणी पोहचवणे हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे काम आहे, तर त्या पाण्याचे सामान वितरण करणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे काम आहे. महापालिकेकडून वितरणाचे काम कंत्राटदारांकडून केले जात आहे. मात्र त्यांच्यावर महापालिकेचे नियंत्रण नसल्याने अनेकदा हे कर्मचारी कामात कुचराईपणा आणि मनमानी कारभार करताना दिसून येतात.
अधिकाऱ्यांना याची कोणतीच माहिती नसते. त्यामुळे या भागात पाणी सोडण्याचे काम करणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांची अक्षरश: मनधरणी करण्याची वेळ नागरिकांवर येत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करूनही नागरिकांना पाणी मिळत नसेल तर ही पाणीपुरवठा योजना नागरिकांसाठी केली आहे की कंत्राटदारांसाठी असा प्रश्न विचारल्या जात आहे. या भागात एक दिवसाआड पाणी पुरवठा होत असतो. त्यातच दोन वेळा पाणी आले नाही, तर चार दिवस पाण्याविना काढावे लागतात.
तसेच नागरिकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पाणीपुरवठ्याच्या नियोजनात सुधारणा करावी, अशी मागणी रहिवासी राजाभाऊ होले, प्रदीप जगताप, राहुल करंजे, अमोल पवार यांनी केली आहे.
याबाबत महापालिकेचे अभियंता निखिल घरत यांच्याशी दूरध्वनीद्वारे दोन वेळा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
जलशुद्धीकरण केंद्राजवळील लष्कर भागात मुख्य वाहिनीतून पाण्याची गळती होत होती. वाहिनीची दुरुस्ती करून पाणीपुरवठ्यामधील अडचण दूर केली आहे. आता पाणीपुरवठा सुरळीत होईल.
- महादेव देवकर, उपअभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण