

नागपूर (Nagpur): राज्यात नागरीकरणाचा वेग वाढता असल्यामुळे शहरांमध्ये निर्माण होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास शासनाचे प्राधान्य आहे. पुणे जिल्ह्यातील हडपसर ते यवत मार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात याव्यात. मात्र हे करताना नागरिकांना कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घेण्यात यावी.
या मार्गावर रस्त्याची सुधारणा करण्यात येऊन उन्नत महामार्ग बांधण्यात यावा. भैरोबा नाल्याजवळील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आवश्यक व तातडीच्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, नागपूर येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मंत्री प्रताप सरनाईक, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मनीषा म्हैसकर तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत राज्यातील पायाभूत सुविधा विकासाला गती देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध रस्ते सुधारणा प्रकल्पांचा सखोल आढावा घेण्यात आला.
बैठकीदरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी विभागातील प्रमुख रस्ते विकासकामांची विद्यमान स्थिती, प्रगती आणि आगामी अंमलबजावणीचे टप्पे याबाबत सविस्तर मांडणी केली. तसेच या प्रकल्पांमुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत होईल असा विश्वास यावेळी त्यानी व्यक्त केला.
हडपसर–यवत (रा.मा. ६५, किमी ८/५०० ते ४०/०००) या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत किमी ८/५०० ते ३३/५०० दरम्यान सहापदरी उन्नत मार्गाचे बांधकाम तसेच विद्यमान रस्त्याचा सहापदरी विस्तार करण्यात येणार आहे. तसेच किमी ३३/५०० ते ४०/००० या टप्प्यात विद्यमान रस्त्याचे सहापदरी बांधकाम प्रस्तावित आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी राज्य वस्तू व सेवा कर सवलतीबाबतचा प्रस्ताव बैठकीत विचारार्थ मांडण्यात आला.
या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे पुणे–दौंड–यवत परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होणार आहे. औद्योगिक क्षेत्रातील हालचाल, शेती उत्पादनाची वाहतूक, नागरिकांचा दैनंदिन प्रवास तसेच परिसरातील आर्थिक क्रियाकलापांना मोठा वेग मिळणार असल्याचे मंत्री भोसले यांनी अधोरेखित केले.
राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी दर्जेदार, टिकाऊ आणि सुरक्षित रस्ते नेटवर्क उभारणे हा सार्वजनिक बांधकाम विभागाचा प्राधान्यक्रम असल्याचे आणि विभागातील सर्व प्रकल्प वेगाने व कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा निर्धार असल्याचेही भोसले यांनी स्पष्ट केले.