Pandharpur : विठ्ठल मंदिर समितीचा रक्षक कंपनीला दणका; नियम, अटींचा भंग केल्याप्रकरणी ठेका रद्द

Pandharpur
PandharpurTendernama
Published on

पंढरपूर (Pandharpur) : श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीने मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या पुणे येथील रक्षक कंपनीला दणका दिला आहे. नियम, अटी व शर्तीचा भंग केल्याप्रकरणी रक्षक कंपनीचा ठेका रद्द केला आहे.

Pandharpur
Mumbai : महानगर क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्प; डीपीआर तयार करण्याचे परिवहन मंत्र्यांचे निर्देश

श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने आउटसोर्सिंग पद्धतीने कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी नियुक्त करणे आवश्यक असल्याने विहित प्रक्रिया राबवून ई-निविदा राबविण्यात आली होती. त्यामध्ये पुणे येथील रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टम्स यांची ई-टेंडर मंजूर केली होती. ४ जुलै २०२४ रोजी करारनामा करण्यात आला होता. तथापि, त्यांच्याकडून करारनाम्यातील अटी व शर्तीचे पालन होत नसल्याने त्यांचा ठेका रद्द करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. मनुष्यबळ कर्मचारी पुरवठा कामामध्ये वारंवार नोटीस देऊनही त्यासंदर्भात योग्य तो खुलासा व सुधारणा होत नसल्याचे दिसून आले होते. तसेच त्यांच्या कामाबाबत विविध प्रकारच्या लेखी तक्रारी देखील प्राप्त झाल्या होत्या. त्यावर मंदिर समितीच्या १० डिसेंबर २०२४ रोजीच्या सभेत चर्चा होऊन, संबंधित पुरवठाधारकास अंतिम नोटीस देऊन, त्यांच्याकडून लेखी खुलासा घेऊन पुढील योग्य ती कार्यवाही करण्याचे ठरले होते. त्यानुसार संबंधित कंपनीला अंतिम नोटीस देण्यात आली होती. त्यावर त्यांनी सादर केलेला खुलासा वस्तुस्थितीला धरून व समाधानकारक नाही.

Pandharpur
Mumbai : MMR क्षेत्रात ‘केबल कार’ प्रकल्पास नितीन गडकरींची तत्वतः मान्यता

मंदिर समितीने फेब्रुवारी, २०२४ मंदिर समितीला कुशल, अर्धकुशल व अकुशल कर्मचारी पुरवठा करण्याकामी ई-निविदा मागविण्यात आल्या होत्या. त्याची अंदाजपत्रकीय रक्कम सुमारे चार कोटी ५० लाख होती. या प्रक्रियेत १२ पुरवठाधारकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये रक्षक कंपनीचा ठेका मंजूर झाला होता. अनेकवेळा लेखी व मौखिक सूचना करूनही सुधारणा झाली नाही. तसेच नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा न करणे, कर्मचाऱ्यांना दोन गणवेश न देणे, पुरवठा आदेशापेक्षा जास्त कर्मचारी नियुक्त करून बिलाची मागणी करणे याबाबत मंदिर समितीने संस्थेविरुद्ध अनेकवेळा कारणे दाखवा नोटिसा बजावून व समज देऊनही सुधारणा होत नसल्याने तसेच वर नमूद अन्य कारणांनी करारानुसार दंडात्मक कारवाई वेळोवेळी केली होती. तथापि, त्यासंदर्भात सुधारणा अथवा कोणतीच कारवाई झाली नाही. सेवा पुरवठा कालावधीच्या एक वर्षातील सहा महिने होऊन देखील सुधारणा नाही व यापुढे देखील सुधारणा होईल असे वरील कारणास्तव वाटत नाही. तसेच हा करार यापुढे देखील सुरू ठेवल्यास, मंदिर समितीची प्रतिमा जनसामान्यांत मलिन होईल, त्याचा भाविकांच्या सोयीसुविधांवर परिणाम होऊन त्याचा रोष मंदिर समितीवर येऊ शकतो. त्या संदर्भात थेट प्रसारमाध्यमांतून बातम्या प्रसिद्ध होऊन मंदिर समितीची बदनामी झाली आहे, तसेच ४ जानेवारी रोजी ‘भटक्या कुत्र्यांचा मंदिरात मुक्त वावर’ अशा बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. यावरून त्यांच्याकडील कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा देत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. त्यामुळे रक्षक सिक्युरिटी सर्व्हिसेस अँड सिस्टम्स ही संस्था करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार कामकाज करू शकत नसल्याने आणि वारंवार नोटिसा देऊनही त्या संदर्भात योग्य तो खुलासा व सुधारणा होत नसल्याने, त्यांच्याशी करण्यात आलेला करार रद्द करणे क्रमप्राप्त झाले होते, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी यावेळी सांगितले.

Pandharpur
Mumbai : 'या' 4 जिल्ह्यांना फडणवीस सरकारकडून मोठे गिफ्ट

या अटी अन्‌ शर्तींचा केला भंग

रक्षक कंपनीने नियुक्त केलेले कर्मचारी हे भाविक- भक्तांना धक्काबुक्की करतात व त्यांना ढकलून देतात, भाविकांशी नम्रतेने न वागणे, कर्मचारी आयकार्ड व गणवेश परिधान करीत नाहीत, नेमून दिलेली सेवा व्यवस्थितपणे पार न पाडणे, मंदिरात प्रवेश करणाऱ्या गेटवर भाविकांची तपासणी न करता मोबाईलसह मंदिरात प्रवेश देऊन करारातील अटी-शर्तीचा भंग करणे, २५ पैकी फक्त दोन माजी सैनिक नियुक्त करून करारातील अटीचा भंग केला, कर्मचाऱ्यांना पेमेंट स्लिप न देणे, कर्मचाऱ्यांना चांगले प्रशिक्षण न देणे, सुरक्षा विभागाकडील कर्मचारी कंपनीचे बोधचिन्ह असलेले गणवेश वापरत नाहीत, सेवेच्या ठिकाणी मोबाईल वापरणे व इतर आनुषंगिक गैरवर्तन करीत असल्याच्या बाबी अनेकवेळा निदर्शनास आलेल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Tendernama
www.tendernama.com